धानोरा महासिध्द : जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या धानोरा हनवतखेड रस्त्यावर हनवतखेड बिटमध्ये बांधण्यात आलेला मातीबंधारा गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने फुटल्याने शेतकर्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. वनविभागाचेवतीने हनवतखेड बिटमध्ये यावर्षीच लाखो रूपये खर्च करून माती बंधारा तयार करण्यात आला. परंतु गेल्या दोन दिवसात धो धो पडणार्या पहिल्याच पावसाने सदर बंधारा फुटला. त्यामुळे बंधार्याखाली वास्तव्यास असलेल्या शेतकर्यांच्या घराचे व शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घरामधील संसारोपयोगी साहित्य, रासायनिक खत, शेती साहित्य (अवजारे) व दुधाच्या दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. तसेच २ एकर शेती खरडून मोठय़ा कष्टाने जगविलेले कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी आज २४ रोजी आ.डॉ.संजय कुटे यांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावर त्यांनी संबंधित अधिकार्याला योग्य ती कार्यवाही करून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकरी गट क्र.९२, ९३, ९४ मधील ईश्वर निना मोहीते, खुशाल भिलाला, राजु अलासे व श्रीकृष्ण लक्ष्मण वानखडे यांनी या नुकसानीबाबत तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देवून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
वनविभागाचा मातीबंधारा फुटला
By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST