तालुक्यातील चंदनपूर येथील शेतकरी विष्णू सखाराम इंगळे यांनी २०२० मध्ये चिखली नाफेड केंद्रावर आपला हरभरा अहिल्याबाई होळकर संस्थेच्या माध्यमातून व्हीसीएमएफला दिला होता. सोबतच्या इतर शेतकऱ्यांचे चुकारे देण्यात आले आहेत. परंतू, विष्णू इंगळे यांच्याकडून वारंवार मागणी होऊन पैसे दिल्या जात नाहीत, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. याबाबत स्वाभिमानीचे नितीन राजपूत यांना माहिती दिली. मलकापूर कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली असता कुणाचेच पैसे बाकी नसल्याचे विदर्भ फेडरेशनकडून स्पष्ट करण्यात आल्याने संबंधित शेतकऱ्याचे पैसे गेले कुठे, असा सवाल स्वाभिमानीने उपस्थित केला आहे. याप्रकरणी संबंधित संस्थेने अफरातफर करून पैसे हडप केल्याची तक्रार शेतकऱ्याने केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकरी विष्णू इंगळे यांना तातडीने पैसे अदा करावे व शेतकऱ्याचे पैसे परस्पर काढून फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई करून अशा संस्था काळ्या यादीत टाकण्यात याव्यात, अशी मागणी नितीन राजपूत यांनी जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक यांच्याकडे केली आहे. यापूर्वीही संबंधित शेतकऱ्याने तहसिलदार, सहायक निबंधक यांच्याकडे मागणी केलेली असतानाही दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यास तातडीने न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे राजपूत, शेतकरी इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, सुधाकर तायडे, विठ्ठल इंगळे, मदन इंगळे यांनी दिला आहे. व्
व्हॉटस्अॅपवर नुसताच चेकचा फोटो
शेतमाल देण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. तथापि शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाते. असे असताना संबंधित संस्थेने शेतकऱ्ंयाच्या थकीत चुकाऱ्यापोटी चेक लिहिला असून त्याचा फोटो व्हाॅटस्अॅपवर टाकून आज देऊ, उद्या देऊ असे कळविण्यात येत असल्याने हा शुध्द फसवणुकीचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकऱ्यासह स्वाभिमानीने केला आहे.