राहेरी बु. : गत काही दिवसांपासून राहेरी बु. परिसरात संततधार पाऊस हाेत असल्याने साेयाबीन शेंगांना काेंब फुटले. त्यामुळे उत्पादन माेठ्या प्रमाणात घटणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
गत आठ दिवसांपासून सतत राहेरी बु. व तालुक्यातील काही परिसरामध्ये पावसाने जोर धरला आहे. अगोदरच या भागात पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, मिरची इत्यादी अनेक पिकांची लागवड उशिरा झाली आहे. त्यानंतर मात्र पावसाने सलग हजेरी लावल्याने सोयाबीन व कपाशी हे पीक पाण्यात असून अक्षरशः खरीप पिकाची नासाडी दिसून येत आहे. कपाशी पिवळी पडली आहे, तर सोयाबीनच्या हिरव्याच शेंगांच्या दाण्याला कोंब फुटले आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
या भागात विहिरी, खडकपूर्णा नदी, ओढे. नाले संपूर्ण तुडुंब भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन या खरीप पिकाला कोंब येत असल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होणार आहे.
पंचनामे करून मदत द्या
राहेरी परिसरात साेयाबीनचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. त्यामुळे, पालकमंत्र्यांनी या परिसरातील नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात सतत पाऊस पडत असल्यामुळे आमच्या परिसरातील सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत व उभ्या सोयाबीन शेंगांच्या दाण्याला कोंब आलेले आहेत.
- कैलासराव भूमकर
माजी सरपंच व शेतकरी, ताडशिवणी
माझ्याकडे पाच एकर सोयाबीन हे पीक असून सलग पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन हे लवकरच पिवळे पडले आहे. पर्यायी उत्पादनात घट होणार आहे. पालकमंत्री यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करून आर्थिक मदत करावी
- समीर देशमुख, शेतकरी