खामगाव : सातत्यपूर्ण अवर्षणाच्या परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील रब्बी हंगामही यावर्षी धोक्यात आला असून, नियोजित क्षेत्राच्या अवघ्या २७ टक्के क्षेत्रावरच प्रत्यक्ष पेरा झाला आहे. परिणामी, यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची साधार भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. खामगाव तालुक्यात १९ हजार ५५0 हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाने केले होते; मात्र प्रत्यक्षात पाच डिसेंबरपर्यंत अवघे पाच हजार ३0९ हेक्टरवरच पेरणी झाली आहे, त्यामुळे तालुक्यात रब्बीचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्याचा गेल्या तीन ते चार हंगामाचा विचार करता निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप व रब्बीचे हंगाम शेतकर्याच्या हातून गेले आहेत. परिस्थिती बदलेल, या अपेक्षेत शेतकरी होते; मात्र सलग दोन वर्षे अवर्षणाची स्थिती आल्याने आता तालुक्यातील कृषी क्षेत्रात त्याचे दृष्य परिणाम समोर येत आहेत. नाही म्हणायला खामगाव तालुक्यात मेहकर तालुक्यानंतरचे सर्वाधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येते. तालुक्यात १२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे; पण प्रकल्पातील जलसाठय़ात पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने सिंचनाचीही समस्या निर्माण होत आहे. परिणाम स्वरूप नऊ हजार हेक्टरवर असलेले गहू पिकाचे नियोजन प्रत्यक्षात एक हजार ३४५ हेक्टरपर्यंंतच झाले आहे. हरभराही कसाबसा एक हजार ९७३ हेक्टरवर पोहोचला आहे. हरभर्याचेही नियोजन नऊ हजार ५२0 हेक्टरवर करण्यात आले होते; मात्र तेही कमी झाले आहे. हीच परिस्थिती मका, सूर्यफूल, करडई, कांदा व अन्य पिकांसंदर्भात दिसून येत आहे. एकीकडे महागाईचा वाढता डोंगर पाहता अवर्षणाच्या स्थितीमुळे अन्नधान्याचे उत्पादनही जिल्ह्यात कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे महागाई येत्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ११ महसुली मंडळात हीच स्थिती असून, ५५ हजार ४६0 शेतकरी तालुक्यात असून, एक लाख २0 हजार १७२ हेक्टर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र असून, त्यापैकी ८३ हजार ६२१ हेक्टर क्षेत्र हे वहितीखाली आहे; पण रब्बीचे नियोजन हे फक्त १९ हजार ५५0 हेक्टवर करण्यात आले होते. त्यापैकी फक्त २७ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा झाला आहे.
अवर्षणाचा रब्बीला फटका!
By admin | Updated: December 6, 2015 02:34 IST