चिखली : तालुक्यातील चंदनपूर येथील ग्रामीण पेयजल योजनेतील काम अंदाजपत्रानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करीत सदर कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी चंदनपूर येथील ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीसमोर २४ सप्टेंबरपासून उपोषण चालविले आहे.
चंदनपूर येथे राष्टीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत नवीन विहीर, विहिरीवरील पूल, स्वीच रूम, डी.पी., पाईपलाईन व त्यावरील एअरवाल आणि पाण्याची टाकीसह गावातील नळ पाईपलाईनचे काम अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान सदर विहीर तलावाच्या संच पातळीमध्ये असल्याने दूषित व अशुद्ध पाणी पिण्यायोग्य नसल्याने आरओ प्लांटची व्यवस्था करावी, पाईपालाईनमध्ये अत्यंत सुमार दर्जाचे पाईप वापरण्यात आले आहे. विहिरीतील पंपदेखील सुमार दर्जाचे असल्याने ते बदलण्यात यावे, पाण्याची टाकी व पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट, लोखंड, रेतीदेखील हलक्या दर्जाचे वापरण्यात आले असल्याने हे निकृष्ट काम पाडण्यात यावे व नवीन दर्जेदार काम करण्यात यावे, गावातील नळ पाईपलाईन पाण्याचा दबाव सहन करू शकत नाही त्यामुळे ते बदलण्यात यावे, एअरवॉलमध्ये गिट्टी, सिमेंट, रेती ऐवजी दगडांचा वापर करण्यात आला आहे, ते देखील तोडण्यात यावे आणि विहिर, पूल, स्विचरूम, विद्युत डीपी. हे तलावाच्या संच पातळीत असल्याने या बाबी तलावाच्या संच पातळी बाहेर घेण्यात यावे, या मागणीसाठी चंदनपूर ग्रामस्थांनी हे उपोषण चालविले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये विनोद इंगळे, देविदास इंगळे, आत्माराम इंगळे, विष्णू पुरी यांचा समावेश आहे.