संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : केंद्र शासनाने २0२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा संकल्प केला असून, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी नव्याने तयार करण्यात आली आहे. २0१७-१८ या वर्षात जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती २६२७, अनुसूचित जमाती ६२४, अल्पसंख्याक ७६२ व इतर ११५७ असे एकुण ५१७0 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.सर्वांना पक्की घरे असावीत, याकरिता शासनातर्फे विविध घरकुल योजना राबविल्या जातात. यापैकी इंदिरा आवास योजनेचे स्वरूप बदलून नव्याने पंतप्रधान आवास योजना तयार करण्यात आली आहे. पूर्वीच्या ९५ हजारच्या लाभाच्या रकमेत वाढ करून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी आता १ लाख २0 हजारचा लाभ देण्यात येतो, तसेच म.ग्रा.ग्रा.रोहयो अंतर्गत १७ हजार ८00 व शौचालयाकरिता १२ हजार असा एकूण दीड लाख रुपयांचा लाभ घरकुल लाभार्थ्यास देण्यात येतो. चालू वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यास प्राप्त झाले असून, सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षणानुसार तेरा तालुक्यांना या उद्दिष्टाचे वाटप करण्यात आले आहे. तालुका पातळीवरून पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींना सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण यादी (जीपीएल) मधील उपलब्ध लाभार्थींचे प्रमाणात ग्रामपंचायत निहाय वाटप करण्यात येणार आहे, तसेच सर्व प्रवर्गातील एकूण उद्दिष्टांच्या तीन टक्के एवढे उद्दिष्ट अपंगांकरिता राखीव आहे.
जागेअभावी लाभार्थी वंचित राहणार!नांदुरा तालुक्यातील प्रपत्र ब मधील बर्याचशा लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा नसल्याने या योजनेच्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच इतर प्रवर्गातील लोकसंख्येच्या तुलनेत उद्दिष्ट फारच कमी असल्याने घरकुलासाठी लाभार्थ्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.