लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोणार तालुक्यात कृषी हंगाम हा शेतकर्यांची अर्थ वाहिनी आहे. त्यामुळे या हंगामावर शेतकर्यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा उंचावल्या. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकर्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस अद्यापही झाला नाही. १५ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकर्यांनी सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढू लागली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी संकटात आहेत. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढावू शकते.
शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा२0१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापैकी यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५00 हेक्टर, तूर १0000 हेक्टर, मूग २000 हेक्टर, उडीद १५00 हेक्टर, सोयाबीन ३८000 हेक्टर, कपाशी २000 हेक्टर, इतर पिके ५00 हेक्टरील पिकांना सध्या पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.