नेहा हटवार व आकाश टेंभुर्णे विजेते : सुधाकर आडे यांचे प्रतिपादन, विजेते राज्य स्पर्धेसाठी पात्रभंडारा : थोर महात्म्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी समाज घडविण्यासाठी केलेल्या महान कार्याचा वसा घेत स्वच्छतेसाठी तरुणांनी समाजाचे प्रेरणास्थान प्रचारक म्हणून काम करावे, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी (पाणी व स्वच्छता) सुधाकर आडे यांनी केले. महाविद्यालयीन युवक युवतींच्या सहभागाने पाणी व स्वच्छतेच्या क्षेत्रात लोकचळवळ निर्माण करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटातील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांचे मार्गदर्शनात आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्य.) भाऊसाहेब थोरात होते. महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अभियंता कर्णेवार, परिक्षक म्हणून प्रगती महिला महाविद्यालयाचे प्रा.मंगेश चवरे, जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या ममता राऊत, क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे, असर फाऊंडेशनचे विक्रम फडके, कार्यक्रम व्यवस्थापक डी.एम. बिसेन व जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी थोरात यांनी, स्पर्धा हा भाषणाचा विषय नाही तर स्वच्छता अंगीकारण्याचा विषय आहे. त्यामुळे तरुणांनी फक्त स्पर्धेपुरते मर्यादित कार्य न करताच मनापासून घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी असे प्रतिपादन केले. महिला व बाल कल्याण समिती सभापती शुभांगी रहांगडाले यांनी, तरुणांनी गावागावात जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृती करावी व गाव हागणदारीमुक्त करावे, असे प्रतिपादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी, मानसिकता बदलविण्याची पहिली पायरी म्हणजे संडास बांधणे होय. जिथे राहतो तिथून स्वच्छतेची सुरुवात व्हायला पाहिजे. स्वच्छतादूत म्हणून स्पर्धेनंतर तरुणांनी ग्रामस्तरावर कार्य करावे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित खेड्यातील समाजाला घडवावे असे आवाहन केले.वरिष्ठ गटात नेहा हटवार तर कनिष्ठ गटात आकाश अव्वलवर्क्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ गटात नेहा हटवार व कनिष्ठ गटात आकाश टेंभुर्णे हे विजेते ठरले.दोन्ही स्पर्धक राज्यस्तरावर भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. वरिष्ठ गटात नेहा हटवार प्रथम, मयूर बोरकर द्वितीय, तर निखीता डाखोरे व शैल शुक्ला या दोन्ही स्पर्धक तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. तर कनिष्ठ गटात आकाश टेंभुर्णे हा प्रथम तर त्रिवेणी समरीत ही द्वितीय तर विपूल रामटेके व मिजल शेख हे दोन्ही स्पर्धक तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता प्रथम पुरस्कार अकरा हजार रुपये, द्वितीय पुरस्कार सात हजार रुपये, तृतीय पुरस्कार पाच हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. दोन्ही गटातील विजेते व उपविजेते स्पर्धकांना पुरस्कार व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत.
स्वच्छतेसाठी तरुणांनी समाजाचे प्रचारक व्हावे
By admin | Updated: January 9, 2017 00:28 IST