बीआरएसपीचा प्रश्न : शासन प्रशासन सुस्त, शेतकरी त्रस्तभंडारा : शासनाने सम्यक विचार करुन भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील २०१५ या वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असताना भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाना आर्थिक मदत न देण्याचे कारण काय, असा प्रश्न बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे जेष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हा अध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी, अनिल भोवते यांनी उपस्थित केला आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान (भात) पिकाचे उत्पादन घेण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील शेती कोरडवाहू शेती असून निसर्गाचा पावसावर अवलंबुन आहे. शेतात धान (भात) पिकाची रोवणी केल्यापासुन तर पिक परिपक्व होऊन कापणीपर्यंत धान पिकाची सतत काळजी घ्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांंना मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत असतो. पंरतु दुसरा कोणताही पर्यायी पुरक व्यवसाय नसल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवाना सर्वस्वी शेतीवरच अवलंबुन राहावे लागते. अशातच खरीप हंगाम २०१५ मध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे व भात पिक तसेच रब्बी हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होवुन पिक उत्पादनात बरीच घट आल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अशावेळी शासनाने शेतकरी बांधवाना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे असतांना अजुनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, अशी शेतकरी बांधवांची ओरड आहे. अस्मानी व सुलतानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरीबांधव कमालीचे आर्थिक विंवचनेत सापडले आहेत. (नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ?
By admin | Updated: January 9, 2017 00:30 IST