इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच आपआपल्या जीवाची पर्वा वाटू लागली आहे. अशातच लसीकरण हा या महामारीवर संजीवनी उपाय म्हणून समोर आला आहे. शासनाने ज्येष्ठांपासून लसीकरणाला सुरुवात केली. मात्र, सद्यस्थितीत लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने तरुणांचे लसीकरण थांबले आहे. परिणामी कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार, याबाबतीत ज्येष्ठांची चिंता वाढली आहे.भंडारा जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील जवळपास सहा लाख नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. लसीचा तुटवडा झाल्याने १० मेपासून या वयोगटातील लसीकरण पूर्णतः बंद आहे. विद्यमान स्थितीत नोंदणीही होत नाही. याशिवाय ज्येष्ठांचे लसीकरण आजही सुरु आहे. ४५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक प्रथम व दुसरा डोस घेत आहेत. परंतु ज्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रथम व नंतर दुसरा डोस घेतला, ती मंडळी आता कुटुंबातील तरुणांनाही व्हॅक्सिन कधी मिळेल, यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. लसीकरण झाल्यास या महामारीपासून आमच्या पाल्यांचा बचाव होऊ शकेल, या भूमिकेत ज्येष्ठ आहेत. शासनाने या लस उत्सवाकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा जोमाने लसीकरण सुरू करावे, अशी बाब या ज्येष्ठांसोबत चर्चेदरम्यान समोर आली. जिल्ह्यात आतापर्यंत दाेन लाख ६७ हजार ६०८ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डाेस घेणारे एक लाख ९८ हजार ५५७ व्यक्ती आहेत. तर दुसरा डाेस घेणारे ६९ हजार ५१ व्यक्ती आहेत. १८ ते ४४ वयाेगटात आतापर्यंत १२ हजार १३६ व्यक्तींनी पहिला डाेस घेतला असून दुसरा डाेसची त्यांना प्रतीक्षा आहे. काेराेना संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे तरुणाई सर्वाधिक घराबाहेर पडते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा अधिक धाेका असताे. १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांचे लसीकरण तात्काळ सुरु करावी, अशी मागणी लस घेतलेले ज्येष्ठ व्यक्ती करीत आहे. आता या वयाेगटातील लसीकरण केव्हा सुरु हाेणार हे मात्र अनिश्चित दिसत आहे.
माझी दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर असतात. मध्यंतरी कोरोना रुग्ण वाढीने चिंता वाढली होती. लसीकरणानंतर तेवढी चिंता राहात नाही. मी लस घेतली. पण, दोन्ही मुलांचे लसीकरण व्हायचे आहे.- रामकृष्ण नंदनवार, भंडारा
मी एप्रिल महिन्यातच लस घेतली. आता दुसरा डोसही घेणार आहे. पण, माझ्या मुलांचे लसीकरण न झाल्याने चिंता सतावते. पुन्हा मोहीम सुरू होताच त्यांना लसीकरणासाठी पाठविणार आहे. - मनोज दलाल,भंडारा
मुलांचे भविष्य सर्वच बाबतीत उज्ज्वल असावे, अशी पालकांची इच्छा असते. विशेषत: आरोग्याविषयी मी जागरूक आहे. माझ्या मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यास चिंता राहणार नाही. -गिरीशचंद्र उजवणे,साकोली