नगरपालिकेचे दुर्लक्ष : जलकुंभाचे प्रवेशद्वार उघडे, सुरक्षा रक्षकाची गरजइंद्रपाल कटकवार - भंडारासव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठा होत असलेल्या जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सहजतेने कुणीही या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करू शकतो. संताजी वॉर्डातील व शास्त्रीनगर चौकातील दसरा मैदानात असलेल्या जलकुंभांच्या सुरक्षेची लख्तरे वेशीवर टांगण्यात आली आहे. जीवनदायीनी वैनगंगा नदीतून भंडारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याची जबाबदारी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची आहे. नगरपालिकेच्या हद्दीत पाच जलकुंभ आहेत. यापैकी एक संताजी वॉर्डात, दुसरे शास्त्रीनगर चौकात, तिसरे पोलीस वसाहत, चवथे जलकुंभ रुग्णालय परिसर व पाचवा जलकुंभ सिव्हील लाईन परिसरात आहे. यापैकी सर्वात महत्वपूर्ण जलकुंभ हे संताजी वॉर्ड व शास्त्रीनगर येथील समजली जाते. शास्त्रीनगर जलकुंभावरील बाजूस असलेल्या प्रवेशद्वार वाकलेल्या स्थितीत आहे. या प्रवेशद्वाराभोवती अर्धवट तारेचे कुंपण आहे. या प्रवेशद्वारातूनच लहान मुले आत जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलकुंभ परिसरात कचराच कचरा साचला आहे. टाकीत पाच मजले असून पायरीवरून कुणीही वर चढू शकतो. सद्यस्थितीत या टाकीत पाणीसाठा नाही. बोरवेलच्या आधारे या टाकीत पाणीसाठा केला जातो. परंतु हे काम सध्या बंद आहे. जलकुंभाची सुरक्षा ऐरणीवर आहे. दसरा मैदानात असलेला हा जलकुंभ तिन्ही बाजूने उघाड पडला आहे. टाकीच्या बाजूलाच कचरा कंटेनरचा भंगार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. संताजी वॉर्डात असलेल्या मुख्य जलकुंभाच्याखालीच नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग आहे. स्वच्छता विभागही येथेच आहे. या ठिकाणी २४ तास पाण्याची साठवण केली जाते. सकाळच्या सत्रात बिल भरणारे नागरिक गर्दी करीत असतात. टाकीच्या वर चढण्यासाठी पायरीवर प्रवेशद्वार असून त्याला नेहमी कुलूप असते. मात्र प्रवेशद्वाराची उंची कमी असल्याने त्यावरून उडी मारून कुणीही प्रवेश करू शकतो. त्यामुळे मुख्य असलेल्या जलकुंभ परिसरात सुरक्षा करण्यासाठी चौकीदार किंवा सुरक्षा गार्डाची गरज आहे.
जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST