लक्ष्मण गोळे यांचे प्रतिपादन : ‘चाकू ते चरखा’ विषयावर उलगडले जीवनातील सत्यभंडारा : समाज आज न उद्या तुम्हाला अवश्य स्वीकारेल, तुम्ही स्वत:ला सुधारण्याच्या मार्गावर पहिले पाऊल टाका, हिंसेने कुठलाच प्रश्न सुटत नाही. आणखी गुंतागुंत वाढते, असे प्रतिपादन लक्ष्मण गोळे यांनी केले.गांधी विचारामुळे गुन्हेगारीच्या चक्रव्युहातून बाहेर पडलेले आय.बी.एन. सेवन जिंदगी लाईव नॅशनल अवार्ड विजेते आणि मुंबई सर्वोदय मंडळाचे समाजसेवी कार्यकर्ते लक्ष्मण गोळे यांनी आज ‘चाकू ते चरखा’ यावर बोलताना आपल्या जीवन प्रवासाचा आढावा जिल्हा कारागृहात उपस्थित बंदीसमोर उलगडला.अध्यक्षस्थानी भारत स्वाभीमान न्यासचे अध्यक्ष रामविलास सारडा होते. मंचावर जिल्हा कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, गांधी विचार मंचचे अध्यक्ष प्रा.वामन तुरिले, लक्ष्मीकांत निमकर, सागर भुरे, आशीष भोंगाडे उपस्थित होते. आपल्या प्रभावी आत्मकथनात गोळे नाशिक कारागृहात महात्मा गांधी यांची आत्मकथा ‘सत्याचे प्रयोग’ त्यांची वाचले आणि त्या पुस्तकाचे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. ते म्हणाले मित्रांनो, मी गुन्हे कबूल केले. शिक्षा भोगण्याची तयारी ठेवली आणि स्वत:ला बदलण्याकरिता पाऊल उचलले. यशस्वी झालो. जीवनातला खरा आनंद मी घेतो आहे. समाजाने मला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मी सध्या कारागृह, शाळा, महाविद्यालयात गांधी विचारांच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधत आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. यावेळी रामविलास सारडा यांनी समाजसेवेचे व स्वत:ला घडविण्याचे अनेक मार्ग सांगितले. मनाचा निग्रह करा व समोर या असे ते म्हणाले. पतंजली योग समितीच्या स्वदेशी चळवळीची माहिती दिली. आभार व्यक्त करताना कारागृह अधीक्षक कुमरे यांनी, बंदींना उद्देशून प्रत्येक चांगल्या कामात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली. गांधी विचार परीक्षांच्या माध्यमातून वाचन, लेखन, चिंतन व विचाराला तुम्हाला सुवर्णसंधी मिळणार आहे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा.वामन तुरिले यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
हिंसेने प्रश्न सुटत नाही तर गुंतागुंत वाढते
By admin | Updated: September 19, 2016 00:38 IST