उपाययोजनांची वाट : वसुली मात्र नियमित, नदी असूनही उपयोग काय? भंडारा : वैनगंगेच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील नागरिकांना दिवसातून दोन वेळा पिण्याचे पाणी मिळत नाही. जुनी जलवाहिनी, वाढती मागणी आणि तांत्रिक समस्या यामुळे पाणी पुरवठाविभाग प्रयत्न करूनही हतबल दिसत आहे. मुलभूत सुविधांमुळे आवश्यक असलेल्या पाण्याचा मुद्दा नगरपालिका प्रशासन निकाली काढू शकली नाही. इंग्रज काळात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून शहरातील नागरिकांच्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेकडे स्वतंत्र विभाग आहे. बारमाही वाहणार्या वैनगंगेच्या काठावरील भंडारा शहरात पूर्वी अनेक कारणांमुळे पाणी टंचाई निर्माण होत होती. त्यावेळी नदीत पाणी नाही. भारनियमन, तांत्रिक बिघाड अशी कारणे सांगून वेळ मारून नेली जात होती. वैनगंगेच्या पात्रात भूमिगत चेतन बंधारा बांधण्यात आला. लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. तरीही शहरवासियांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. भारनियमनाचा त्रास होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीकडून एक्सप्रेस फिडरचीजोडणी करण्यात आली. २४ तास वीज पुरवठा करूनही नागरिकांना पाण्यापासून दूरापास्त व्हावे लागले. जीर्ण जलवाहिनी असल्यामुळे वारंवार लिकेजची समस्या सुटता सुटली नाही. त्याचबरोबर फेसाळयुक्त दुषित पाणी अनेक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्याही शहरातील अनेक भागात पहावयास मिळते. वॉर्डातील अनेक भागात पिण्याचा पाण्याचा थेंब मिळत नाही. पाणी कराची वसुली मात्र नियमितपणे केली जाते. (शहर प्रतिनिधी)
भंडारेकरांना मिळेना दोन वेळचे पाणी
By admin | Updated: May 25, 2014 23:18 IST