तुमसर : सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याचे हमी घेणारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील पाच वॉटर कुलर पिण्याचे थंड पाणी मागील एक ते दीड महिन्यांपासून बंद आहेत. या भीषण गर्मीत येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गरम पाण्यानेच तृष्णा भागवावी लागत आहे. येथे अजुनपर्यंत स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले नाही. जागतिक बँकेकडून आर्थिक मदतीने तुमसर शहरात शहर व तालुक्याकरिता तीन कोटी रूपये खर्च करून १00 खाटांचा रुग्णालय तयार करण्यात आला. राज्य शासनाने त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला. अधिक कर्मचारी येथे कार्यरत आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकरिता पाच वॉटर कुलर रुग्णालयात लावले, परंतु सर्वच वॉटर कुलर मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. सध्या त्यातून गरम पाणीच बाहेर येत आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्यात हाताला चटके देणार्या पाण्याने तृष्णा कशी भागवणार, असा प्रश्न येथील शेकडो रुग्णांना पडला आहे. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेरील हॉटेलमध्ये पाण्याने तृष्णा भागवित आहेत. हॉटेल, चहा दुकानदारांना दुरून पाणी आणावे लागत असल्याने किती नागरिक व रुग्णांना पाणी द्यावे, असा सवाल त्यांनी केला आहे. मध्यमवर्गीय रुग्ण व त्यांचे नातेवाईक दुकानातून पाण्याची बॉटल्स घेत आहेत. रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे. शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्यावर या वॉटर कुलरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याची माहिती दिली, परंतु तांत्रिक बिघाड केव्हा दूर करणार याबाबत काहीच सांगितले नाही. संपूर्ण उन्हाळाभर असेच गरम पाणी येथील रुग्णांना प्यावे लागणार, असे येथील चित्र दिसत आहे. उष्माघात कक्ष नाही एप्रिल, मे व जून महिन्याचा शेवटीपर्यंत पूर्व विदर्भात अतीशय कडक उन्हाळा असतो. प्रत्येक शासकीय रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्षाची स्थापना होणे गरजेचे आहे. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात अजूनपर्यंत स्वतंत्र उष्माघात कक्ष तयार करण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)
उपजिल्हा रुग्णालयात गरम पाण्याने भागविली जाते तृष्णा
By admin | Updated: May 24, 2014 23:23 IST