जोडधंदा प्रभावी : कृषी विभागाच्या पुढाकाराची गरज लाखांदूर : शासनाच्या दप्तरी कुठलिही नोंद नसलेला परंतु भरपूर जीवनसत्व असलेला ‘कचरकांदा’ शासकीयस्तरावर अद्यापही उपेक्षित आहे. कांदा म्हणजे कंद. कंद हा मुळापासून तयार होत असल्याने अन्य फळांपेक्षा त्यात जास्त जीवनसत्त्व असते. त्यामुळे जंगलातील प्राणी मुख्यत: कंदावर जगतात.मानवी जीवनाची सुरुवातही पूर्वीपासून कंदावरच होती. कांदा हा जीवनातील आहाराचा एक मुख्य भाग आहे. त्यात कांदे अनेक प्रकारचे असतात. अनेक औषधी गुणधर्म तसेच जीवनसत्त्व व खनिजामुळे कांदा पौष्टिक व गुणकारी असून ते चांगले अन्न म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचलित असलेल्या या कांद्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मराठीमध्ये प्रामुख्याने या कांद्याला कचरकांदा किंवा केसाळ कांदा असे म्हणतात. कांदा हे अँलीक्सी कुळात मोडणारे व अँलिअम वंशात जन्माला आलेले नैसर्गिक पीक आहे. कचरकांदा अनेक लोकांना माहित आहे. परंतु त्याच्या उत्पत्तीबाबत सर्वच लोक अनभिज्ञ आहेत. कचर कांद्यावर आजपर्यंत कोणतेही संशोधन करण्यात न आल्याने पुस्तकी भाषेत किंवा शासनाकडे याची कुठेही नोंद नाही. परंतु या कचरकांद्याला भरपूर मागणी आहे. लोकसंख्येच्या तुलनेने हा कांदा अपुरा पडत असल्याने या कांद्यावर संशोधण होणे गरजेचे आहे. भारतात कांदा सर्वत्र आढळत असून पौष्टिकतेबाबत व उपयुक्तेबाबत लोकजागृती नसल्याने हा कांदा उपेक्षीत आहे. परंतु या कांद्याच्या भरवशावर अनेक कुटुंब शेती व्यवसायासोबत जोडधंदा करीत आहेत. या कांद्याला मानवी जीवनात महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष दिल्यास हा कांदा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा म्हणून उदयास येऊ शकतो. ज्याप्रमाणे शिंगाडा या पिकाने शेती व्यवसायात स्थान निर्माण केले आहे, त्याचप्रमाणे कचरकांद्याची शासनाने दखल घेतल्यास शिंगाडा उत्पादनातून ज्याप्रमाणे लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली तशा संधी या व्यवसायातूनही मिळू शकतात.निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव वनस्पतीला विशिष्ट ओळख दिली आहे. परंतु कचरकांदा या पिकाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास व जनजागृती न झाल्याने ते दुर्लक्षित पीक ठरले आहे. वास्तविक या कांद्याच्या उपयुक्ततेबाबत नव्याने कृषी क्षेत्रात जोडधंदा पीक म्हणून नोंदणी झाल्यास एकूण लोकसंख्येच्या काही प्रमाणात लोकांना हा कांदा रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. दूरदर्शन, रेडीओ, वृत्तपत्र, नियमकालिके, मासिके, साप्ताहिके, कृषी संचालय, कृषी विद्यापीठे आदी प्रसार माध्यमातून कचरकांदा वगळता इतर पिकांबाबत पुरेशी माहिती पुरविली जाते. परंतु आजही कचरकांदा यापासून दूर आहे. (तालुका प्रतिनिधी)
शासनस्तरावर ‘कचरकांदा’ उपेक्षित
By admin | Updated: October 3, 2015 00:41 IST