चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांच्या हितासाठी दि सहकारी राईस मिल सोसायटी निर्माण करण्यात आली आहे. परंतु सध्या या मिलची वाताहर झाली आहे. धान घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी कक्ष नसल्यामुळे मिलमध्येच मुक्काम करावा लागतो. त्याचप्रमाणे शौचालयाची सुविधा नसल्यामुळे उघड्यावरच सर्व विधी आटपावा लाग आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे धान भरडाई (पिसाई) करण्यासाठी सहकार क्षेत्रातून राईस मिलची निर्मिती करण्यात आली आहे. धान भरडाई (पिसाई) करिता येणाऱ्या शेतकऱ्यासाठी विश्रांती घेणारे कक्ष तयार करण्यात आले नाही. रात्रभर शेतकरी मिल मध्येच मुक्काम ठोकतात. या मिलमध्ये साधे शौचालय तयार करण्यात आले नाही. उपक्रमांना सहकार क्षेत्रात उदासिनता दिसून येत आहे. चुल्हाड गावात सन १९६४ मध्ये दि सहकारी राईस मिल सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. १८ गावचे सभासद या मिलच्या कार्यकारिणी मंडळात आहेत. ५० वर्षी पुर्वी बांधकाम करण्यात आलेली इमारत आजघडीला जिर्ण झाली आहे. पंरतु वाढत्या स्पर्धेत ही मिल डबघाईस निघाली आहे. इमारतीला जागो-जागी भेगा पडल्या आहेत. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. यामुळे सहकारी राईस मिल शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांची लहान मुले टेबलावर विश्रांती घेत आहेत. जमाव, गर्दी तथा २४ तास कार्य करणाऱ्या मिलमध्ये मंजुरी देतांना शौचालय बांधकामाची अट नाही. पिण्याचे शुध्द पाणी नाही. विश्रांती कक्षाचे नियोजन नाही. यामुळे शेतकऱ्याची वाताहात होत आहे. बहुतांश खाजगी मिलमध्ये हया सुविधा बोटावर मोजण्या इतपत आहेत. परिणामी शौचालय नसल्याने शेतकरी राईस मिल आवारात उघड्यावर शौचास जात आहे. विकासाकरिता सहकारी राईस मिल संचालक मंडळ तथा खाजगी राईस मिल मालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांचा मिलमध्येच मुक्काम
By admin | Updated: January 24, 2015 00:23 IST