देवतळे यांचे प्रतिपादन : भंडारा नगर पालिकेचा उपक्रमभंडारा : कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल. नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या दिनदयाळ अंत्योदय योजना, उपजिविका अभियानांतर्गत कौशल्य विषयाचे तरूण-तरूणींनी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करून कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी रवींद्र देवतळे यांनी केले.जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राष्ट्रीय नागरी उपजीिवका अभियानांतर्गत नगर परिषद आणि राबीया मॉयनारीटी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण मेळावा बाबा मस्तानशहा वॉर्डातील कम्युनिटी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन हाजी अब्दुल सलाम पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक बालाजी मरे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे, अशपाक पटेल, साकाबुद्दीन खान, अनिक जमा उपस्थित होते. यावेळी बालाजी मरे म्हणाले, कौशल्य उद्योजकता अभियानांतर्गत शासनाकडून विविध योजना सुरू आहेत. या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता यावी. याकरीता कौशल्य मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून लाभार्थ्यांनी आपल्या गरजेनुसार प्रशिक्षण विषयाची निवड करुन सफलता पूर्वक प्रशिक्षण पूर्ण करावे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना एन.सी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र देण्यात येते. यावेळी प्रवीण पडोळे म्हणाले, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या ३४५ लाभार्थ्यांचे विविध विषयांतर्गत प्रशिक्षण सुरु करण्यात आले असून त्यापैकी २४७ लाभार्थ्यांचे मार्च २०१६ अखेर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले. व्यक्तिगत रोजगार सुरू करण्याकरिता स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत भांडवल उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्यांनी या अभियांनातर्गत घेतलेल्या कर्जावरील सहा टक्के व्याजावरील अनुदान देण्यात येते. शहरातील बेरोजगार युवक-युवतींनी बाजारातील औद्योगिक गरजेनुसार व आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले. सदर कौशल्य प्रशिक्षण मेळाव्यात २५० लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी ९० बेरोजगार युवक- युवतींनी विविध प्रशिक्षणामध्ये आपल्या नावाची नोंद केली. प्रास्ताविक राजू पटेल यांनी केले. मेळाव्यासाठी शहर अभियान कक्षाचे व्यवस्थापक अनिल जिरापुरे, समुदाय संघटक उषा लांजेवार, रेखा आगलावे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज
By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST