भंडारा : फेसबुकवरुन झालेल्या मैत्रीतून लाखनी येथील दोन तरुणी बेपत्ता झाल्या होत्या. भंडारा पोलिसांनी या तरुणींचा शोध घेत अवघ्या ४८ तासात त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतले.
गीता (नाव बदललेले) आणि राजश्री (नाव बदललेले) या दोन्ही २३ वर्षिय तरुणी ५ जुलै रोजी लाखनी येथे काॅलेजमध्ये जातो म्हणून घरुन निघून गेल्या होत्या. परंतु त्या परत आल्या नाही. त्यावरुन त्यांच्या वडीलांनी लाखनी ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात लाखनीचे ठाणेदार वाढीवे यांनी पथक तयार केले. सायबर पोलिसांकडून तांत्रिक माहिती मिळविली. त्यावेळी या दोन्ही तरुणी जळगाव जिल्ह्यातील कोलनवी परिसरात असल्याचे पुढे आले. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती जळगाव जिल्ह्यात यापूर्वी कार्यरत असल्याने त्यांनी पथकाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. पथक पोहचताच तरुणींनी तेथून पळ काढला. फेसबुकवरुन झालेल्या ओळखीच्या माध्यमातून त्यांचे लग्न एका मंदिरात लावून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेच गावातील काही मंडळी व भंडारा पोलिसांचे पथक मंदिरात दाखल झाले. त्यात दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. अवघ्या ४८ तासात ही कारवाई करण्यात आली. या पथकातील महिला पोलीस अमलदार वासंती बोरकर यांनी प्रसंगवधान राखून फेसबुकवरील माहिती आणि सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई केली.
तरुणी होत्या लग्नाच्या तयारीत
लाखनी तालुक्यातून बेपत्ता झालेल्या दोन तरुणी जळगाव जिल्ह्यातील कोलनवी येथील एका मंदिरात लग्न करण्याच्या तयारीत होत्या. मात्र पोलीस वेळीच पोहचल्याने या मुलींची सुखरुप सुटका झाली.