सिराज शेख मोहाडीतालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झालेले नसतानाही मोहाडी तालुक्यातील रेतीघाटातून सर्रासपणे रेती काढून चढ्या भावाने रेती विक्री जोमात सुरू आहे. या प्रकाराला महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचा आशिर्वाद प्राप्त असल्यानेच रेती तस्करांचे फोफावत असल्याचे बोलले जाते.मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रतील बेटाळा, मोहगाव, मुंढरी, रोहा, पांजरा तसेच सुरनदी पात्रातील रेती दिवसा ढवळ्या चोरी केल्या जात आहे. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर बांधकामाचे कामे सुरू असून त्याठिकाणी बिनादिक्कत रेती आणली जात आहे. मात्र रेतीघाटाचे लिलाव न झाल्याने रेतीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. नागरिक आपल्या घराचे बांधकाम थांबवून ठेवण्याऐवजी हजार दोन हजार जास्त गेले तरी चालेल म्हणून रेती तस्कराकडून अधिक भावाने रेती घेत आहेत. आम्हाला अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. त्यामुळे रेतीचे भाव थोडे जास्तच ठेवावे लागतात असे रेती आणून देणाऱ्यांचे म्हणणे असते.मोहगाव, पांजरा, बेटाळा, सातोना तसेच सुरनदीवरील इतर रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी होत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या रेतीव्यवसायातून जरी शासनाचा नुकसान होत असेल पण रेती तस्कर व काही महसूल अधिकारी मालामाल होत आहेत. बांधकामावर सर्रास रेती पोहचत आहे हे उच्च अधिकाऱ्यांना सुद्धा दिसते. मात्र काही तांत्रिक कारणे समोर करून तेरी भी चुप मेरी भी चुप असा कारभार बिबोभाटपणे सुरू असल्याने रेती चोरीवर आळा घालणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेतीच्या ट्रॅक्टरमुळे व ट्रकमुळे घाटाजवळील गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि या जिवघेण्या रस्त्याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. महिन्यातून दोन चार ट्रक किंवा ट्रॅक्टरवर कारवाई करून आम्ही किती दक्ष आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न महसूल विभाग अवश्य करीत असतो.रेतीघाटांचे लिलाव नेहमीच उशीरा करण्यात येतात आणि बांधकामाला रेतीची आवश्यकता असल्याने काहीही करा रेतीचोरी करावीच लागते, असा प्रकार सुरूच असतो. प्रशासन पहिल्या लिलावाची मुदत संपण्यापूर्वीच दुसरा लिलाव कां करीत नाही, असा प्रश्न साहजिकच जनता विचारत आहे. यावरून मधातला तिनचार महिन्याचा काळात रेतीचोरी होणारच हे प्रशासनाला माहित नसते का, तसेच रेती चोरी व्हावी हा प्रशासनाचा उद्देश तर नाही ना असाही प्रश्न जनता करीत आहे. मात्र महसूल विभागातर्फे अपुरा कर्मचारीवर्ग, पोलीस व महसूल विभागाचा समन्वय तसेच रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवाची सुरक्षा असे कारणे दिली जातात. बहुतांशवेळी ही कारणेही योग्यच मानावी लागतात. वेळेवर रेतीघाट लिलाव होणे हेच एक उपाय आहे.
रेतीचोरीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:48 IST