कारधा ते निलज या रस्ता बांधकामासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही ठिकाणी माती टाकून ठेवली आहे. पवनी पुलापासून ते नगरपरिषद महाविद्यालय पवनीपर्यंतचा रोड या ठिकाणी मातीचे भरण टाकून सहा महिने लोटून गेले. परंतु अजूनही काम केले नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माती टाकून ठेवल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून या रोडवरुन जावे लागते. रस्त्याच्या कडेला असलेली घरे आणि दुकानांमध्ये धुळच धूळ असते. धुळीचा त्रास सहन न झाल्याने काही दिवसांपूर्वी नागरिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन देखील करावे लागले होते. पवनीच्या पुलावर मोठे खड्डे व पुलाच्या दोन्ही बाजूला माती जमा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्याला ब्लॅक स्पॉट घोषित करून तेथे बदल करावा, असे सांगितले आहे. परंतु इतके अपघात होऊन व मृत्यू होऊन बांधकाम कंपनी, कंत्राटदार आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. अपघाताच्या तांत्रिक चुका काय, याचे विश्लेषण करण्याची तसदी सुद्धा संबंधित अधिकारी घेत नाही. याकडे लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून नागरिकांचे जाणारे नाहक प्राण वाचवावे व दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, यानंतर अपघातात कुणाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.