राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा धान उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा भंडारा : शासनाच्या राष्ट्रीय कृषी विमाय योजना खरीप हंगाम २०१४ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पिके आणि मंडळे / तालुके अधिसूचित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ३१ जुलै पर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात (धान), सोयाबीन तसेच सन २०१४ - १५ मध्ये लागवड केलेला ऊस इत्यादी पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पिक पेरणी केल्यानंतर एक महिन्याचे आत किंवा ३१ जुलै पूर्वी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी राज्य शासनाच्या पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणाऱ्या पिक सर्व्हेक्षण अंदाजाच्या मंडळ किंवा मंडळ गट आणि तालुका किंवा तालुका गट यापैकी लागू असलेल्या अधिसूचित क्षेत्रावर पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे. जिल्ह्यात शासनाने पुढील प्रमाणे मंडळ किंवा मंडळगट आणि तालुका किंवा तालुका गट पिक विम्यासाठी अधिसूचित केलेले आहेत. भात पिकासाठी मंडळनिहाय मोहाडी तालुका मोहाडी, वरठी, आंधळगाव, कांद्री, कान्हाळगाव, करडी, तुमसर तालुका तुमसर, मिटेवानी, गर्रा (बघेडा), नाकाडोंगरी, सिहोरा, पवनी तालुका पवनी, आमगाव, आसगाव, अड्याळ, कोंढा, चिचाळ, साकोली तालुका साकोली, सानगडी, एकोडी, लाखनी तालुका लाखनी, पिंपळगाव, पालांदूर, पोहरा, लाखांदूर तालुका लाखांदूर, विरली (बु.), बारव्हा, मासळ.सोयाबीन पिकासाठी मंडळ निहाय भंडारा तालुका भंडारा, बेला शहापूर, धारगाव, खमारी, पहेला, मोहाडी तालुका मोहाडी, वरठी, आंधळगाव, कांद्री, कन्हाळगाव, करडी, पवनी तालुका पवनी, आमगाव, आसगाव, अड्याळ, कोंढा, चिचाळ, लाखांदूर तालुका लाखांदूर, विरली (बु), बारव्हा, मासळ जिल्ह्यात उसासाठी तुमसर गट जाहीर केलेला असून सर्वसाधारण जोखीम ८० टक्के, सर्वसाधारण विमा संरक्षण विमा संरक्षित रक्कम आडचाली, पूर्वहंगामी सुरु व खोडवा यासाठी वेगवेगळी निश्चित केलेली असून सर्वसाधारण विमा हप्ता दर ७.५० ते ८.५० टक्के प्रती हेक्टर निश्चित केलेला आहे.सदर राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करण्यासाठी भारतीय विमा कंपनीकडून वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ४८ तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण इत्यादी माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी, बँक, तलाठी, विमा कंपनी यांनी कळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील धान, सोयाबीन व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागीहोऊन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषी विभागाने केलेले आहे. या योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)
प्रज्ञा गोळघाटे यांचे प्रतिपादन : सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरणार
By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST