उपाययोजना शुन्य : जलयुक्त शिवार योजनेतून जलस्तर वाढविण्याची गरजशिवशंकर बावनकुळे साकोलीभंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असला तरी वर्षानुर्वे गाळ न उपसल्याने हे तलाव उथळ झाले आहेत. नदी नाल्याची खोलीही दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून झळी स्वरूपाचा पाऊस पडत नाही. जंगलांचा ऱ्हास, जमिनीचे क्षरण व अन्य कारणामुळे तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भूर्गभजलाचा साठा कमी होऊन पातळी खोल जात आहे. तलावातील गाळ उपसा होत नसल्याने जिल्ह्यासह सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून शासनाने गावोगावी जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. परंतु साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेंतर्गत असणारे नदी नाले तलाव या योजनेत सध्यातरी समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे कधी नव्हे अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरात शेतशिवारात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. साकोली नगरपरिषदने याबाबत उपाययोजना आखण्याची गरज आहे. या उन्हाळ्यात उपाययोजना केल्यास किमान पावसाळ्यात पाण्याचा जलस्तर वाढण्यास मदत होईल.सध्या वर्ष २०१६-१७ मध्ये तालुक्यात सहा गावात १२ तलावांमध्ये तर २०१७-१८ मध्ये सात गावांमध्ये १८ तलावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे सुरू आहेत हे येथे उल्लेखनीय आहे. वर्ष २०१७-१८ च्या योजनेत साकोली-सेंदुरवाफाचा समावेश नाही. परंतु गरज आता आहे, म्हणून विशेष प्रकरण म्हणून साकोली येथे जलयुक्त शिवाराची कामे प्राधान्याने घेण्याची गरज आहे.
उपस्याअभावी तलाव बनले उथळ
By admin | Updated: May 4, 2017 00:29 IST