अशोक पारधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : राज्य परिवहन महामंडळाच्या पवनी बसस्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विद्युतची पुरेशी सोय नाही. त्यामुळे संध्याकाळपासून मुख्य बसस्थानक अंधारमय झालेले असते.
नागपूर रोडवर असलेले बसस्थानक व बसआगार पूर्वी पवनी नगरापासून खूप अंतरावर होते, पण गेल्या दहा वर्षांत शिवाजीनगर, शेषनगर, न्यू शेषनगर अशा नवीन वसाहती बसस्थानकासमोर तयार झाल्या. त्यामुळे बसस्थानक गावापासून दूर राहिलेले नाही. बसस्थानकाचा एवढा मोठा परिसर अंधारमय राहिला, तर असामाजिक तत्त्वे एकांतवासाचा गैरफायदा घेतील व अनैसर्गिक घटना घडल्यानंतर परिसरात विद्युत दिवे लावले जातील.
त्यापेक्षा खबरदारीचा उपाय म्हणून बसस्थानक, बसआगार व परिसरात विद्युत दिवे लावले जावे. गोसीखुर्दचा उजवा कालवा व त्यालगत शेती व जंगल असल्याने अंधाराचा फायदा घेऊन वन्यजीवांचे वास्तव्य परिसरात वाढू शकते. गावालगत धोका टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने, विधानसभा सदस्यांनी जातीने लक्ष केंद्रित करून बसस्थानक, बसआगार परिसरात विद्युत दिवे लावण्यासाठी निधीची तरतूद करावी व परिसरातील अंधार दूर करावा, अशी मागणी आहे.
200921\img-20210915-wa0023.jpg
पवनी चे मुख्य बस स्थानक व बस आगारात एकच विद्युत दिवा.