भंडारा : शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकाने हयगय केल्याचा आरोप होत असताना त्याची चौकशी मात्र थंडबस्त्यात आहे. हा प्रकार लाखनी येथील समर्थ विद्यालयातील आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी किशोर कुथे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.माहितीनुसार, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक कोल्हारे यांना दि.१ एप्रिल ते ३० जून २०१४ या कालावधीतील शालेय पोषण आहाराची माहिती किती याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी माहिती संदर्भात दुजोरा दिला नाही. त्यानंतर माहितीच्या अधिकारांतर्गत कुथे यांनी लाखनी पंचायत समितीतून माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती मार्फत पत्र देण्यात आले होते.संबंधित शालेय पोषण आहाराची माहिती समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून घेण्यात यावी, अशी बाब नमूद करण्यात आली. त्यानुसार मुख्याध्यापक यांनी व महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेडकडून मिळालेल्या शालेय पोषण आहाराची पोच पावतीची झेरॉक्स प्रती मिळाली. त्यात दोन्ही पावती अंतर्गत असलेली माहिती संशयास्पद आहे, असे आढळले. मिळालेल्या साहित्यांतर्गत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुथे यांनी केली आहे. या पावतीपैकी मिळालेली एक पावती ‘डुप्लीकेट’ असल्याचा आरोपही कुथे यांनी जिल्हाधिकाऱ्यांंना दिलेल्या निवेदनातून केला आहे.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित शाळेचे अध्यक्ष व कार्यवाह यांना करण्यात आली आहे. संबंधित पोषण आहार संदर्भात चौकशी झाल्याचेही माहिती आहे. मात्र त्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही. ‘कुठे पाणी मुरले’ याचा थांगपत्ता लागलेला नाही. चौकशी अंती प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पोषण आहाराची चौकशी थंडबस्त्यात
By admin | Updated: June 22, 2014 23:54 IST