युवराज गोमासे - करडी (पालोरा)कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदेवर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. सागवान वृक्षांवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. पानांमधील रसाचे शोषण ही अळी करीत असल्याने पाने पिवळी पडली असून फक्त जाळीदार शिरा दृष्टीस पडत आहेत. अन्य झाडांची पाने सुद्धा किडली गेल्याने वनसंपदेचे नुकसान होत आहे. तत्काळ उपाययोजनेची गरज आहे.वातावरणातील बदलाचा फटका मनुष्यजातीप्रमाणे वन्य संपदेवरही जाणवू लागला आहे. वनातील लाखो रुपयांची मौल्यवान वनसंपदा लष्करी अळीच्या आक्रमणात सापडली आहे. लष्करी अळी पानाफुलांचा फडशा पाडत आहे. अळ्यांचे आक्रमणाने झाडे जळाल्यासारखी भासतात. त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र वनविभागाकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही. हा चिंतेचा विषय आहे. भंडारा जिल्ह्यातील बहुतेक वनक्षेत्र राखीव जंगलात समाविष्ट करण्यात आला आहे. भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी तालुक्यातील जंगलाचे बहुतेक क्षेत्र उमरेड - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात, कोका वन्यजीव अभयारण्यात सामावून घेण्यात आला आहे. न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोहाडी व साकोली तालुक्यात बहुतेक जंगल आहे. यावर्षी प्रारंभापासून पावसाचा लपंडाव सुरु होता. पर्जन्यमान कमी झाल्याने व तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम मनुष्याबरोबर पशुपक्षी व वृक्षांवर सुद्धा झालेला दिसत आहे. त्यातच ढगाळ वातावरणाने विविध त्रासदीत भर घातली. विविध आजाराने मनुष्यास ग्रासले आहे. पशुपक्षीही त्यातून सुटलेले नाहीत. आता वनसंपदेवरही त्याचा प्रादूर्भाव जाणवत आहे. झाडांची पाने खिळखीळी झाल्यानंतर लष्करी अळ्यांनी आपला मोर्चा फांद्याकडे वळविला आहे. सागवान वृक्षांची विदारक स्थिती आहे. वनविभागाने या रोगाचे अळीचे वेळीच नियंत्रण करणे, उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. कोट्यवधी वनसंपदेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वरिष्ठ स्तरावरून सुद्धा प्रभावी उपाययोजना सुचविणे गरजेचे झाले आहे.
वनसंपदेवर लष्करी अळीचे आक्रमण
By admin | Updated: September 22, 2014 23:14 IST