तंटामुक्त समितीचा पुढाकार : एकलारी येथील प्रकरणवरठी : शालेय जीवनात दोघात प्रेम फुलले. प्रेमाच्या विश्वात रमताना नकळत बंधने झुगारण्याचे ठरवले. पाहता-पाहता एकमेकांशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था निर्माण झाली. प्रेमप्रकरण घरी पोहचले. मुलाच्या घरी पालकाचा विरोध व मुलीच्या पालकाचे समर्थन होते. दोन तीन दिवसापासून प्रकरण तापत असतानाच सर्वसंमतीने प्रकरण तंटामुक्त गाव समिती पुढे आले. अखेर या प्रेमीयुगुलाचे लग्न लावण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुलाचे मनोमिलन झाले.एकलारी येथील स्वप्नील सरसराम कुथे या युवकाचे गावातील प्रगती दिलीप माकडे या युवतीसोबत प्रेम जुळले. प्रेमांचे रूपांतर लग्नात करून अख्ख आयुष्य सोबत जगण्याचे स्वप्न दोघेही ‘सैराट’ वागू लागले. यात दोघेही एवढे जवळ आले की, एकमेकाशिवाय जगु शकत नाही, अशी अवस्था झाली. कालांतराने सुट्या लागल्यामुळे भेटण्याचे प्रमाण कमी झाले. अशातच दोघानाही घरच्यांना दोघाच्या प्रेमप्रकरणाची चाहुल लागली.सुरूवातीला दोघाच्या घरच्यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला. स्वप्नीलवरचे प्रेम प्रगतीला अस्वस्थ करीत असल्यामुळे तिने पालकाजवळ लग्नाचा तगादा लावला. स्वप्नीलच्या पालकांनी समजुत घातल्यामुळे तो काही प्रमाणात दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला. लग्न केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आग्रही भूमिका मुलीने घेतल्यामुळे तिच्या पालकांना नमते घ्यावे लागले. त्यांनी पुढाकार घेऊन लग्नाच्या हालचालीना सुरुवात केली. पण मुलाच्या पालकांना विरोध होता. याला कारणही होते. कारण मुलगा पायावर उभा नाही. अखेर सदर प्रकरण कायद्याच्या पायरीवर गेले. दोन-तीन दिवसापासून प्रकरण निस्तारण्याच्या हालचाली झाल्या. पण मुलीच्या हट्टासमोर सर्वांना झुकावे लागले. अखेर या प्रेमाचा शेवट लग्नात झाला.सर्वस्तरावरुन प्रयत्न करूनही लग्नाशिवाय पर्याय नव्हते. अखेर महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने दोघांचे एकलारी ग्रामपंचायत कार्यालयात लग्न लावून देण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबू वाघमारे, सरपंच रामेश्वर कारेमोरे, उपसरपंच युवराज सेलोकर, त्रिवेणी वासनिक, विलास ठोंबरे, बोथलीचे सरपंच कैलास तितीरमारे, दिलीप माकडे यांच्यासह गावातील शंभराच्यावर नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रेमीयुगूल विवाहबंधनात
By admin | Updated: May 15, 2016 00:23 IST