चुल्हाड (सिहोरा) : म्हाडा योजनेंतर्गत राजीव गांधी टप्पा २ चे घरकूल भंडारा जिल्ह्यात वाटप करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना बिनाव्याज गृहकर्ज उपलब्ध करण्यात आले असले तरी बँकांची वसुली सुरु झाली असल्याने १४ हजाराहून अधिक लाभार्थ्यांवर व्याजाचा भुर्दंड बसत आहे.ग्रामीण भागात गरीब सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहेत. हक्कांचा निवारा देणारी घरकूल योजना आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी करताना संबंधित विभागाने शब्द फिरविल्याने लाभार्थ्यांचे व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न चर्चेला आलेला आहे. परंतु तोडगा काढण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय यंत्रणेने घेतला नाही. यामुळे लाभार्थी अडचणीत आलेले आहेत. भंडारा जिल्ह्यात म्हाडा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राजीव गांधी टप्पा २ ही घरकूल योजना सन २०१० वर्षात राबविण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांचे ३५ ते ९० हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्यास अशा लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली आहे. ही यादी अंतिम मंजुरीकरिता पंचायतसमिती स्तरावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर करण्यात आली. या योजनेत बँक ९० हजार आणि लाभार्थी १० हजार रुपये असे योजनेचे स्वरुप होते. गृहकर्ज म्हणून दिली जाणारी ही आर्थिक मदत बिनाव्याज बँकांना १ लक्ष रुपये १० वर्षात लाभार्थ्यांनी परत करण्याची अट असल्याची माहिती आहे. प्रस्तावित मंजूर यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नजीकच्या बँकांना दिली. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी गावात संबंधित लाभार्थ्यांची चौकशी करीत १ लक्ष रुपयाचे गृहकर्ज मंजूर केले. या निधीची परतफेड करताना १० वर्षाचे हिस्से आकारणी करण्यात आली. यात व्याज आकारणीची अट नव्हती. बँकांना व्याजाची राशी म्हाडा देणार असल्याने घरकुलांचे बांधकाम केले. अल्पनिधीत घरकुलांचे बांधकाम होत नसल्याने लाभार्थ्यांनी उसनवारीवर पैशाची जुळवाजुळव केली. आर्थिक टंचाई असताना हक्काचा निवारा तयार केला. खापा गावातील महादेव उके, खंताडू तितीरमारे, सुखदेव उके, डिलीराम बावनथडे, ललीता शरणागत, सुखदास पटले, संजयि शरणागत, इंद्रकुमार शरणागत अशी लाभार्थ्यांची नावे आहेत. (वार्ताहर)
घरकूल लाभार्थी अडचणीत
By admin | Updated: August 17, 2014 22:58 IST