शेतकरी संकटात : पाणी मिळण्याची आशा मावळलीआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामाची कामे संथ गतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.१९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटींच्या वर गेली आहे. दोन तपे व मुळ धरण्याच्या किमतीत २० पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांपर्यंत या धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेताला पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडी ज्या प्रमाणे शिजावी, त्याप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती होत आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोटी टी.एम.सी. पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला अजिबात होताना दिसत नाही. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमिटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावात जमा होणार आहे. यात १२० दशलक्ष घनमिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून ६४ हजार ३६२ हेक्टर शेतीचे सिंचन होण्याची शक्यता आहे. परंतु या कालव्याचे काम अजून पूर्णत्वाकडे गेलेले नसल्याने सिंचनाचा फायदा होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच आसोला मेंढा तलावातील पाण्याच्या साठ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावाचे पुनर्वसनाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कालव्यातून पाणी इतक्यात वाहून नेणे शक्य नाही. असेच दिसत आहे.दुसऱ्या महत्वाच्या डावा कालव्याचे बांधकामच वादाच्या व भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. हा कालवा गोसे पासून लाखांदूरपर्यंत जात आहे. या कामाची लांबी २२.९३ किलोमिटर आहे. तर सिंचन क्षमता ४० हजार २०६ हेक्टरची आहे. या कालव्याचे काम उच्च प्रतिचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम सिंचन महामंडळाने सुरु केले आहे.नव्याने बांधकाम लागत असल्याने आतापर्यंत या कामावर झालेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या कालव्याची ४४१ कोटी अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र एवढे होऊनही शेतकऱ्यांना या कालव्याचा शेतकऱ्यांसाठी सिंचन उपयोग होताना दिसत नाही. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)
गोसेखुर्द कालव्याची कामे संथगतीने
By admin | Updated: May 3, 2015 00:41 IST