भंडाराकरांना चिऊताईची ओली हाकबालपणी जिच्यासोबत पहिली ओळख होते ती चिऊताई ! ही चिऊ दिवसभर गवताच्या काड्या, कापूस, धागे, पिसे जमा करून घरात घरटे बांधायची. आज मात्र ती विव्हळते आहे. काय आहे तिचे म्हणणे? चिऊताई म्हणते, ‘‘चिल्ल्या-पिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता ? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहत आहे. घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काहीजण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’चिमण्यांची चिमणी पाखरं लहान कीटकांवर वाढतात. हे कीटकही जंतुनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीत जास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहत नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. शहरात पाणी अनेक ठिकाणी उपलब्ध असते मात्र, ते स्वच्छ नसते. अनेकांनी आपल्या घराबाहेर पाखरांना पाणी पिता यावे म्हणून सोय केलेली आहे. मात्र, ते रोज बदलवले जात नाही. ते बदलवणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त पाणी लागते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात व फ्लॅटच्या बालकनीमध्ये धान्य व स्वच्छ पाणी रोज उपलब्ध करून द्यावे.
मूठभर तांदूळ अन वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी!
By admin | Updated: April 3, 2015 00:18 IST