यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला असून, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची सोय नाही त्यांनी इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करून रोवणी आटोपली; मात्र आता धान जगवा यासाठी पावसाची नितांत गरज असून यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात येत आहे. साकोली तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प असून, निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असले तरी तो पूर्णपणे तयार झालेला नाही. दुसरा प्रकल्प धानोरा येथील भुरेजंगी प्रकल्पाचे काम मागील ३० वर्षांपासून वन कायद्यात रखडलेले आहे. तर तिसरा प्रकल्प वडगाव येथील भिमलकसा हा पूर्ण झाला असून, त्याच्या त्या प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपयोगात येत आहे; मात्र उर्वरित दोन प्रकल्प अपूर्ण असून, या प्रकल्पाच्या शेतीसाठी काहीएक उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे लक्ष देऊन तत्काळ पाण्याची सोय करावी व शेतकऱ्यांना हरित क्रांतीसाठी मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील आठवड्यापासून साकोली तालुक्यात पाऊस येत आहे; मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे तलाव बोडी याच्यात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी चातकासारखी पाण्याची वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST