बाळा काशीवार यांचे प्रतिपादन साकोली : आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल. आतापर्यंत सर्व विभाग जलसंधारणाची कामे विस्कळीत स्वरूपात राबवीत होती. कामामध्ये समन्वय नसल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. परंतु महाराष्ट्र शासनाने ५ डिसेंबर २०१४ रोजी टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घेऊन वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडवावे, जेणे करून भूगर्भातील पाणीसाठी वाढवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले. बरडकीन्ही येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून सभापती नारायण वरठे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती श्रावण बोरकर, पंचायत समिती सदस्य मंदा कापगते, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.के. सांगळे, खंडविकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी अधिकारी के.एम. बोरकर उपस्थित होते. साकोली तालुक्यातून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी दहा गावांची निवड करण्यात आली असून बरडकिन्ही हे यातील एक गाव या सर्व दहाही गावाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे, जी.बी. साठवणे, अनिल काडगाये, गोपीचंद कानेकर, मंगेश गायकवाड, भोजराज बनकर, रायभान सोनवाने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा
By admin | Updated: January 29, 2015 23:02 IST