तुमसर : ऐतिहासिक आंबागड किल्ल्या शेजारील तलाव परिसरातून मागील अनेक महिण्यापासून गौण खनिज (गिट्टी) चे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. शासनाने पर्यटनस्थळ म्हणून या परिसराची निवड केली आहे. या प्रकारामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुमसर तालुक्यातील आंबागड येथून तीन किमी अंतरावरील रामपूर या गावाच्या हद्दीत शासकीय गट क्रमांक ११४ व शासनाने दिलेल्या ११० गट क्षेत्रातून गौण खनिजांचे (गिट्टी) अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. येथून ऐतिहासिक आंबागड किल्ला केवळ शंभर ते दिडशे मिटर अंतरावर आहे हे विशेष. हा संपूर्ण परिसर सातपुडा जंगलात मोडतो. आंबागड किल्ल्याजवळ मागील भागात मोठे जुने तलाव आहे. तलाव परिसरात हे अवैध उत्खनन सुरु आहे. शासनाने हा संपूर्ण परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पर्यटन स्थळ विकासाकरिता शासनाने निवड केली आहे. राजरोसपणे गौण उत्खननामुळे पर्यावरणाला सुध्दा धोका निर्माण झाले आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी येथे यापूर्वी संबंधितांवर कारवाई निश्चित केली आहे. मात्र त्यानंतर उत्खनन करणा-यांनी पुन्हा डोके वर काढले असून आता येथे रोजरोसपणे उत्खनन सुरु आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचारी धज्जावत नसल्याने गौण तस्करांचे फावत आहे. उत्खनन करणारे येथे निश्चितच निष्ठावले आहेत. कर्मचाऱ्याना येथे संरक्षण देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
गौण खनिजांचे उत्खनन
By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST