भंडारा : दहावीचा निकाल आज लागला. उद्यापासून अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार असली तरी जिल्ह्यात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. यावर्षी १५ हजार ७१५ विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले असून जिल्ह्यातील १४० कनिष्ठ महाविद्यालयात १६ हजार १४० जागा आहेत. त्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार असून ४२५ जागा रिक्त राहतील.जिल्ह्यात अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये वरीष्ठ महाविद्यालय संलग्नित ११ शाळा, माध्यमिक शाळा संलग्नित ८७, स्वतंत्र १७, जिल्हा परिषद संलग्नित २०, नगर पालिका संलग्नित ५ असे एकूण १४० महाविद्यालये आहेत.यात वरीष्ठ महाविद्यालय संलग्नित महाविद्यालयात कला शाखेच्या १८ तुकडीमध्ये १,४४०, विज्ञान शाखेच्या १५ तुकडीमध्ये १,२००, वाणिज्य शाखेच्या ७ तुकडीमध्ये ५६० तर संयुक्त शाखेच्या २ तुकडीमध्ये १६० अशी ८० विद्यार्थ्यांची तुकडी राहणार असून ३,३६० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता राहील. उच्च माध्यमिक शाळा संलग्नित महाविद्यालयात कला शाखेच्या १३७ तुकडीमध्ये ८,२२०, विज्ञान शाखेच्या ६६ तुकडीमध्ये ३,९६०, वाणिज्य शाखेच्या ७ तुकडीमध्ये ४२० तर संयुक्त शाखेच्या ३ तुकडीमध्ये १८० अशी ६० विद्यार्थ्यांची तुकडी राहणार असून १२,७८० विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता राहील. दोन्ही शाळा मिळून १४० महाविद्यालयातमध्ये २६५ तुकडीमध्ये १६ हजार १४० विद्यार्थी प्रवेशक्षमता राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सर्वांनाच मिळणार प्रवेश अकरावीसाठी १६,१४० जागा
By admin | Updated: June 18, 2014 00:03 IST