दिव्याखाली अंधार : बावनथडी प्रकल्पात नियोजनाचा अभावतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. परंतु नियोजनाच्या अभावी प्रकल्प क्षेत्रापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावासह तुमसर तालुक्यातील डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याचे दिसून येते.मागील ३५ वर्षापूर्वीपासून बावनथडी प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु होते. अनेक अडथळ््यातून त्यातून मार्ग काढण्यात आला. सुमारे १,४०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प मागीलवर्षी पूर्ण झाला. धरणात पाणी साठवणूक करण्यात आली. अनेक लहान वितरिकेची कामे शिल्लक आहेत.बावनथडी प्रकल्प हा तुमसर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या आदिवासी गाव सितेकसा येथे आहे. या प्रकल्प स्थळापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावांना सिंचनाचा लाभ होत नाही. तालुक्यातील सुमारे डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. यात लेंडेझरी, खापा खुर्द, आलेसूर, रोंघा, लवादा मंगरली, गोबरवाही, सीतासावंगी, पौनारखारी, भोंडकी, गुडरी, खंदाड, सौदेपूर या गावांचा समावेश आहे. दिव्याखाली अंधार अशी येथील स्थिती आहे.सोंड्या उपसा सिंचन योजनेमुळे चांदपूर जलाशयाची सिंचन क्षमता वाढविण्यात आली. तशाच पद्धतीने गोबरवाही व खापा खुर्द परिसरात उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्याची गरज आहे.यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. शासन व प्रशासन या बाबींचा अभ्यास करीत असल्याचे उत्तर मिळत आहे.आधीच प्रकल्पांना पूर्णत्वास बरीच वर्षे लागली. तरीसुद्धा येथे नियोजनाचा अभाव दिसून येतो. सिंचनापासून वंचित गावाकरिता ठोस उपाययोजना न केल्यास किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
डझनभर गावे सिंचनापासून वंचित
By admin | Updated: June 23, 2014 23:42 IST