भंडारा : राष्ट्रीय सणाच्या दिवशी २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे तसेच इतर महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टीक व कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॉस्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर व कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे हे टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या वापरावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी सुद्धा जनजागृती करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्तक दिनी कुणीही प्लॉस्टीक किंवा कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले आहे.हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्र शासन व इतर यांच्या विरुद्ध २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ४ आॅगष्ट व २९ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार १ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादक विक्रेते तसेच वितरक यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गोळा केलेले राष्ट्रध्वज स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करावेत. हे करताना उपस्थित सवोनी उभे राहावे व ते पूर्णपणे जळून नष्ट होईपर्यंत ती जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यासाठी अशासकीय संस्था, संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज जमा करून जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार यांच्याकडे सूपुर्द करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी पालकांनी सुद्धा मुलांच्या हातात राष्ट्रध्वज देतांना मुलांना सूचना देऊन महत्व समजावून सांगावे. (प्रतिनिधी)
कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका
By admin | Updated: January 23, 2015 01:08 IST