करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायत मधील १३ वित्त आयोग व तंटामुक्त गाव पुरस्कार निधीच्या उसणवार १ लाख १० हजार रक्कमेचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. इतरही अनेक फंडातील रक्कमेत गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण झालेला असून नवनियुक्त सरपंचांनी सन २०१०-१५ मधील कामकाजाचे 'आॅडीट' करण्याचे ठराव संबंधितांना दिले. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रकरणी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.जांभोरा ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभाराचे नाविण्यपुर्ण किस्से सतत उजेडात येत आहेत. ग्रामपंचायत मधील सन २०१०-१५ या कालखंडात झालेले भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असून मासिक व ग्रामसभेत प्रकरणे गाजत आहेत. माजी सरपंच, सचिवाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, मनमर्जीने १३ वित्त आयोग निधीतून ५० हजार रुपयांचा निधी इतर कामांसाठी काढून घेतला व खर्चही केला. तंटामुक्त गाव पुरस्कार निधीतील ६० हजार रुपयांचा निधी सुद्धा इतर कामासाठी वापरला. तत्कालीन सचिवांनी सदर रक्कम आवश्यक कामांसाठी उसणवार घेतल्याचे सांगत आहे. मात्र मासिक सभेत व ग्रामसभेत सदर प्रकरणी सदस्यांचे आक्षेप आहेत. खर्चासंबंधिचे ठराव पारित झालेले नाहीत, असे असतांना निधी उसणवार घेऊ न, खर्च नियमबाहय का करण्यात आला हा प्रश्न अनुत्तरित आहे. उसणवार घेतलेले पैसे वर्ष लोटले असतांना संबंधित खात्यात जमा करण्याचे आलेले नाहीत. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत कमेटीला त्या रकमेतून विविध विकास कामांचे नियोजन व अंमलबजावणीही करण्यात अडचणी येत आहेत. ग्रामसभामधून त्या संबंधाने अनेकदा नागरिकांची ओरड असते ती वेगळीच. सदर दोन्ही फंडाची रक्कम विशेष प्रयोजनाकरिता शासनामार्फत दिला जातो. त्यातील निधी इतरकामांसाठी वापर करण्यास निर्बंध असतांना तत्कालीन सरपंच व सचिवांनी स्वमर्जीने निर्णय कसा काय घेतला? वर्ष लोटले, सत्ता परिवर्तन झाले मात्र १ लाख १० हजार रुपयांचा निधी उपरोक्त फंडात जमा न झाल्याने दोषींकडून त्वरित रक्कमेची वसुली करुन जमा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)
‘आॅडिट’ करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
By admin | Updated: September 5, 2015 00:45 IST