लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दररोज कोरोनाबाधितांची संख्या शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे काही काळ सुरू असलेले पाचवी ते नववी तसेच अकरावीचे वर्ग बंद करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
ग्रामीण भागात तर कोरोनाने पहिल्यांदाच अधिक संख्येने हातपाय पसरले आहेत. जिल्हाभर यामुळे भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. शाळेत होणारी विद्यार्थ्यांची गर्दी व कोरोनाचा कहर यामुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह शिक्षक, कर्मचारीही धास्तावले आहेत. विविध गावातून विद्यार्थी शाळेत येत असतात. तसेच गावात कोणाच्या घरी कोविड रुग्ण आहे, याचा पत्ता लागत नाही. शाळेत तापमान तपासणी व दररोज विद्यार्थ्यांचे हात निर्जंतूक केले जात असले तरी मोठा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर वेळीच निर्बंध घातले जावेत. यासाठी किमान पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग तूर्त बंद करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे, सचिव राजू बांते, रेखा भेंडारकर, प्रमोद धार्मिक, प्रदीप मुटकुरे, सुनील गोल्लर, अर्चना बावणे, राधेश्याम धोटे, विष्णूदास जगनाडे आदींनी केली आहे.
बॉक्स
अधिकाऱ्यांमध्ये कमालीची भीती
भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे केवळ पाच पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना द्या, असे सांगण्यात आले. मात्र, मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन द्यायचे असल्याचा निरोप देऊनही त्यांना बोलावण्यात आले नाही. सुमारे अर्धा तास संघाचे पदाधिकारी बोलावण्याची प्रतीक्षा करत होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी बाहेर पडले. त्यांनी मुख्याध्यापक संघाचे निवेदन घेतले नाही म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन द्या, असे एका कर्मचाऱ्याने संगितले. मात्र, त्यांनीही निवेदन घेण्यास नकार दिला. तसेच तेथील अधीक्षक यांना निवेदन देऊ शकता, असे सांगण्यात आले. एका अधिकाऱ्यांनी तर कोविड -१९ प्रादुर्भाव आहे कळत नाही का, असे म्हणत तिथून हाकलून लावले. डिस्पॅचमध्ये निवेदन द्या, असेही सांगण्यात आले. एक तास फिरवाफिरवी झाल्यानंतर मुख्याध्यापक संघाने अखेर डिस्पॅचला निवेदन दिले.