भंडारा : संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या भंडारा-गोंदिया मतदार संघात पुन्हा एकदा भाजपला कौल देत मतदारांनी नाना पटोले यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा १ लाख ४९ हजार ८३६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गेल्यावेळच्या (२00९) लोकसभा निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या बसपासह यावेळी चर्चेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या आणि इतर सर्वच पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांची यावेळी जमानत जप्त झाली. नाना पटोले यांना एकूण ६ लाख ६ हजार १२९ मते मिळाली तर पराभूत उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना ४ लाख ५६ हजार ८७५ मते मिळाली. सायंकाळी ७.३0 पर्यंत अंतिम निकाल जाहीर होणे बाकी होते. मात्र पटोले यांच्या विजयाचा कल दुपारी १२ वाजताच स्पष्ट झाला होता. त्यामुळे भंडारा आणि गोंदियात कार्यकर्त्यांचा जल्लोष दुपारपासूनच सुरू झाला होता. फटाके उडवत, गुलाल उधळत आणि ढोलताशावर नाचत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ८ वाजता सुरक्षा यंत्रणेच्या कडक बंदोबस्तात भंडारा येथील सामाजिक न्याय भवनात मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी सामाजिक न्याय भवनाकडे जाणार्या सर्व मार्गावर पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच नाना पटोले यांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींचा चांगलाच भ्रमनिरास झालेला दिसत होता. अनेकांनी दुपारी १२ नंतर तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नाना पटोले यांनी सजविलेल्या वाहनावरून भंडार्यात मिरवणूक काढली. मात्र मिरवणुकीला अधिकृत परवानगी नसल्यामुळे कोणताही बँड वगैरे न लावताच ते खुल्या जीपवरून फिरले. निकाल ऐकण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर भाजप कार्यकर्ते भंडार्यात दाखल झाले होते.
भाजपने मारली मुसंडी
By admin | Updated: May 16, 2014 23:47 IST