५० संघटनांचा सहभाग : सरकारविरोधी दिल्या घोषणाभंडारा : जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महापुरुषांचे कार्य पुढे नेणे ही सर्वांची जवाबदारी आहे. समाजातील जातीसमूह व घटकांचे एकत्रिकरण करून बहुजन समाजाच्या हक्क अधिकारांच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज भंडाऱ्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा मैदान येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या मोर्च्याचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्च्याचे मुख्य संयोजक समीर कदम, प्राध्या. वासनिक, बळीराम सार्वे, विलास खोब्रागडे, नरेंद्र मडावी, शीतल पिल्लेवान, सुधीर पिल्लेवान, माधवराव फसाटे, देवचंद वैद्य यांनी केले. वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ओबीसी, एस.टी., व्ही.जे.एन.टी., डी.एन.टी., बलुतेदार व धार्मिक अल्पसंख्यांक यांचा बहुजन क्रांती मोर्चात समावेश होता. रविवारला हा मोर्चा दसरा मैदान येथून निघाला. त्यानंतर मोर्चेकरी शहरातील मुख्य मार्गाने घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. तत्पूर्वी या मोर्चाला समर्थन देणाऱ्या विविध ५० संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा मैदानावर एकत्रित झाले होते. यावेळी तिथे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिस्तबध्द पध्दतीने धडकला. या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोपर्डी येथील अत्याचार करणाऱ्यावर व आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, पीडितांना संरक्षण देऊन न्याय द्यावा, देशात महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, राष्ट्रीय स्तरावर एस.टी., एस.सी. प्रमाणे ओबीसी, भटके विमुक्त प्रवर्ग व बलुतेदार यांची जातीनिहाय जनगणना करावी, राखीव जंगलावरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून १२ टक्के आरक्षण लागू करावे, ग्रामपातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मुलींच्या वस्तीगृहात स्त्री अधीक्षकाची नियुक्ती करावी. उद्योगपतींना देण्यात आलेली कर्जमाफीसारखा लाभ शेतकऱ्यांना द्यावी. छोटी किंवा मोठी धरण असलेल्या भागातील मच्छीमार बांधवाना मासेमारीचा हक्क द्यावा, विद्यार्थी पटसंख्येच्या नावावर ग्रामीण भागातील शाळा बंद करुन शिक्षकांना अतिरिक्त ठरवून बहुजनांचे शिक्षण संपविण्याचे कटकारस्थान थांबवावे, एस.सी., एस.टी., ओबीसी च्या राखीव जागांवरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी. अल्पसंख्याक समुदायांसाठी कॅम्युनल राईटस् अॅक्ट बनविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा व राष्ट्रमाता जिजाऊ यांची वेशभुषा केलेले बालक मोर्च्याच्या अग्रस्थानी सर्वांचे आकर्षण करीत होते. मोर्च्यात नरेंद्र मडावी, शिवदास गजभिये, आनंद मैदमवार, सदानंद इलमे, राजेश मेश्राम, अशोक शेंडे, राजेश कांडे, शबीर पठाण, पविता पाटील, शिला रामटेके, भावना बोरकर, सुचिता गजभिये, अश्विनी डोंरगे, करुणा डांगे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
बहुजनांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
By admin | Updated: January 9, 2017 00:24 IST