भविष्यात समस्या उद्भवणार : तरीही रेतीचा सर्रास उपसा सुरूचतुमसर: जीवनदायीनी बावनथडी नदी भर पावसाळ्यात एका पावसानंतर कोरडी पडली आहे. नदीवर धरण तयार झाल्याने ती कोरडी पडली काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पुन्हा बारा महिने ती कोरडी राहिली तर पर्यावरण व मानवासह जनावरांवर त्याचा परिणाम होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘गंगा को बचाना है’, या निर्धारासोबत वैनगंगेलाही केंद्र शासनाने वाचविण्याची गरज आहे.मध्यप्रदेशातून उगम पावलेली बावनथडी नदी महाराष्ट्रातील बपेराजवळ वैनगंगेत तिचा संगम होतो. या नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासनाचा बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प तयार केला. सन २०१३ मध्ये या प्रकल्पात जलसाठा करण्यात आला. वैनगंगेची बावनथडी नदी आहे.सध्या बावनथडी प्रकल्पात ४२ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पातून भंडारा जिल्ह्यातील १७,५३७ हेक्टर तर बालाघाट जिल्ह्यामध्ये १८,६१५ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे. नाकाडोंगरी या गावाजवळून वाहत जाणारी बावनथडी नदी सध्या कोरडी पडली आहे. या स्थळावरून प्रकल्प १५ कि़मी. अंतरावर आहे. बावनथडी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. नदीपलीकडे मध्यप्रदेशाची सीमा सुरू होते. पावसाळ्यात ही नदी भरून वाहते. परंतु दोनच दिवसात ती कोरडी पडत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. आता नदीवर धरण झाल्याने नदीला पाणीच नसल्याचे तेच नागरीक सांगत आहेत.मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाणी सोडल्यावर नदीला मोठा पूर येतो, धरणामुळे आता ती शक्यताही कमीच आहे. पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे याचा परिणाम पर्यावरण, मानवी जीवन तथा जनावरांवर होईल, तर नाही ना? असा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याकरिता पाणी, शेती व नंतर उद्योगधंद्यांना पाणी देण्याचा कायदा आहे. येथे तर पिण्याकरिताच पाणी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. पुढे १५ कि़मी. वैनगंगेवर वाहनी मांडवी येथे पुन्हा ४५० कोटीचा बंधारा तयार करण्यात आला आहे. सिंचनासोबतच वीज प्रकल्पाला पाणी देण्यात येत आहे. बावनथडी नदीतून रेतीचा प्रचंड उपसा करणे व बाराही महिने सुरूच आहे. मध्यप्रदेश शासनाने रेतीघाट लिलाव केला आहे. नदीत सीमा निश्चित नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. येथे नदीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. केंद्र शासनाने गंगा को बचाना है अशी मोहिम हाती घेतली असून हजारो कोटी रूपये त्यावर खर्च करणार आहे, वैनगंगा तथा बावनथडी नदीच्या दुर्दशेला कोण वाचविणार की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
भरपावसाळ्यात बावनथडी कोरडीच
By admin | Updated: August 4, 2014 23:34 IST