मोहाडी : तालुका व गावात आरोग्य विभागाची तगडी यंत्रणा असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्यापासून दूर असल्याचे निदर्शनास येते.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर काम करावे लागते. या विभागातील कर्मचाऱ्यांना वार्षिक लक्ष दिले जाते. वार्षिक लक्षाच्या दिशेने त्यांना कर्तव्य बजावून साध्य साधण्यासाठी वेगळी वेळ द्यावी लागते. आज आरोग्य विभागाकडे गावपातळीवर कार्य करण्यासाठी वेगळी वेळ नाही तसेच बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती तयार करण्यात आल्या आहेत. या इमारतीत आरोग्य विभागाचे कर्मचारी राहत नाही. कर्तव्यस्थान सोडून आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरातून ये जा करतात. त्यामुळे त्यांचा दिलेल्या कामावर दुर्लक्ष होत चालले आहे. हे आरोग्य विभागाच्या आढाव्यावरून स्पष्ट दिसून येते. शस्त्रक्रियासाठी आरोग्य विभागाला ८०३ चे वार्षिक लक्ष दिले होते. पण आजपर्यंत ११४ वार्षिक लक्ष साध्य झाले. ४८० तांबी बसवायच्या होत्या. यापैकी केवळ ७९ तांबी बसविण्यात आल्या आहेत. २ मात्रा तिहेरी लसचे लक्ष २२९३ आहे. फक्त ७१४ साध्यापर्यंत आरोग्य विभाग पोहचला आहे. पोलीओ लस ३ मात्रा २२९३ यापैकी ७१४ लक्ष साध्य झाले. बीसीजी लस २२९३ वार्षिक लक्ष यापैकी ३७७ च्या आकड्यात लक्ष पोहचले आहे. गोवर लसाचे २२९३ वार्षिक लक्ष देण्यात आले. त्यापैकी ७१७ लक्ष साध्य झाले. तिहेरी लस पुरक मात्रेचे २३६८ वार्षिक लक्ष दिले गेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८३८ लक्षापर्यंत काम झाले आहे. पोलिओ लस पुरक कामाचे वार्षिक लक्ष तेवढेच होते आणि साध्यही तेवढ्यावर गेले आहे. गरोदर मातांची नोंदणीचे वार्षिक लक्ष २५२३ आहे. त्यापैकी आजपर्यंत ९२७ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली आहे. धनुर्वात प्रतिबंधक लस मातांना द्यायची आहे. त्याचे वार्षिक लक्ष २५२३ आहे. त्यापैकी ८८५ लक्ष आतापर्यंत साध्य झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
आरोग्य विभाग उद्दिष्टांपासून दूर
By admin | Updated: September 18, 2014 23:30 IST