तुमसर : नैसर्गीक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्याकरिता नदी काठावरील गावाकरीता जिल्हा आपत्ती प्राधीकरणाने बोटी दिल्या आहेत. नियोजनाच्या अभावी सध्या या बोटी नदी काठाऐवजी रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत पडून असल्याचे दिसून येते. आधुनिक व महागड्या बोटींच्या सुरक्षेकरिता सक्षम यंत्रणा दिसत नाही.राज्य शासनाने नदी काठावरील गावातील नागरिकांकरिता पावसाळ्यात पूरस्थिती पासून धोका उद्भवू नये, तथा त्यास समर्थपणे तोंड देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण तयार केले आहे. त्या अंतर्गत धोका उद्भवणाऱ्या गावातील बोटी दिल्या आहेत. सध्या या बोटी नदी काठाऐवजी गावाबाहेर रस्त्याच्या कडेला ठेवल्या आहेत.दि.१३ नोव्हेंबर २.१३ मध्ये उमरवाडा घाटकुरोडा वैनगंगेच्या नदी पात्रात डोंगा उलटून १३ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले होते. आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भंडारा ते तडकाफडकी बोटींची व्यवस्था केली. मृतदेहांना शोधण्याकरिता आधुनिक बोट व निष्णात पोणाऱ्यांची मदत घेतली होती. या बोटी नदी काठावर आपत्तीच्या वेळी असाव्यात याकरिता त्यांची व्यवस्था करण्यात आली. सध्या ही बोट माडगी येथे युनिव्हर्सल फोटो कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर समोर ठेवली आहे. बोटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील आठ महिन्यापासून ही बोट धूळखात पडून आहे. या कारखान्याचे सुरक्षा गार्ड सध्या या बोटीची सुरक्षा करीत असल्याचे दिसून येते. ही बोट वजनदार असून सुमारे एक ते दीड लाखाची आहे. अप्रिय घटना घडल्यावर तिला नदी पात्रात आणण्याकरिता कमीत कमी एक ते दीड तास निश्चित लागेल. इतक्या वेळेत बुडणारा व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने येथे या बोटीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुमसरात आपत्ती निवारण बोट रस्त्यावर
By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST