तुमसर : पवनारा येथील एका वृद्ध कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. बळीराम गोमा उईके (७२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.पवनारा येथे उईके यांची सहा एकर शेती आहे. जिल्हा बँकेतून त्यांनी कर्ज उचलले होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते काल दुपारी १ वाजता घरून निघाले. सायंकाळी ते परत आले नाही. कुटूंबियांनी गावात व परिसरात शोधाशोध केली, परंतु त्यांचा शोध लागला नाही. सकाळी ७ वाजता त्यांचा मोठा मुलगा सुनिल शेताकडे निघाला तेव्हा शेताजवळील पवनारा रेल्वे ट्रॅकजवळ झाडावर वडीलाचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसला. याप्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. त्यात त्यांनी जिल्हा बँकेचे कर्ज असल्याचे तक्रारीत नमूद केले. बळीराम यांना तीन मुले आहेत. त्यापैकी एकाचे निधन झाले असून दोन मुले व वडील तिघेही शेती करीत होते. वडिलांनी जिल्हा बँकेतून कर्ज घेतल्याचे कुटुंबात सर्वांना माहित होते. कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत ते राहत होते, अशी माहिती आहे.या प्रकरणाची तुमसर पोलिस चौकशी करीत आहे. घटनास्थळाला तुमसरचे पोलीस निरीक्षक किशोर गवई यांनी भेट दिली. बँकेचे किती कर्ज होते, शेती कुणाच्या नावावर आहे व कर्ज किती घेतले होते याची चौकशी सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: June 21, 2014 01:01 IST