सहा टक्के भंडारावासीयांचा समावेश : देशात सबसिडी सोडणारे केवळ चार टक्के गॅसधारकभंडारा : केंद्र सरकारने मार्च २०१५ मध्ये गॅस सबसिडी सोडण्याबाबत सुरू केलेल्या ‘गिव्ह इट अप’ या मोहिमेला भंडाराकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशपातळीवर जेमतेम ४ टक्के ग्राहकांनी गॅस सबसिडी सोडलेली असताना भंडारा जिल्ह्यात मात्र सहा टक्के गॅस ग्राहकांनी सबसिडी नाकारली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीनुसार, देशात एचपी गॅस, इण्डेन गॅस व भारत गॅसचे १५ कोटी ०५ लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना एलपीजी सिलेंडरवर सुमारे ३३ हजार ६३२.९३ कोटी रूपयांची सबसिडी दिली जाते. २७ मार्च २०१५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तींनी एलपीजीवरील सबसिडी सोडावी, असे आवाहन केले होते. प्राप्त आकडेवारीनुसार, जानेवारी अखेरपर्यंत देशभरातील ६८ लाख ४३ हजार ३५ ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या देशातील एकूण ग्राहकांच्या चार टक्के आहे. भंडारा जिल्ह्यात एचपीसीएलचे १ लाख ५ हजार २६१ ग्राहक, आयओसीएलचे ५१ हजार ७९५ तर बीपीसीएलचे २० हजार ८०८ असे एकूण १ लाख ७७ हजार ८६४ ग्राहक आहेत. यापैकी एचपीचे ८ हजार ८१९, इण्डेनचे २ हजार ४७५ तर भारत गॅसचे ६०२ असे एकूण ११ हजार ८९६ ग्राहकांनी सबसिडी सोडली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या सहा टक्के ईतकी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
११,८९६ ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी
By admin | Updated: February 16, 2016 00:43 IST