चुलत भावावर गुन्हा दाखल; दारूमुळे झाला होता वाद
गुन्हा दाखल : दारू पिल्यानंतर दोन चुलत भावांत झाला वाद
अंबाजोगाई : दारू पिल्यानंतर दोन चुलत भावांत वाद झाला. यावेळी भांडणात एका भावाने दुसऱ्याला बेदम मारहाण करत गळा दाबून त्याचा खून केला. ही घटना अंबाजोगाईतील क्रांती नगर भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
संतोष लालासाहेब चव्हाण (वय ३५, आ. बेलदार वस्ती, क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे गळा दाबून खून केलेल्या मयताचे नाव आहे. संतोषची पत्नी गंगुबाईच्या फिर्यादीनुसार, संतोषला दारूचे व्यसन होते. संतोष आणि त्याचा चुलत भाऊ शिवाजी बळीराम चव्हाण या दोघांमध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत. मंगळवारी सकाळपासूनच ते दोघे सोबत मद्यपान करत बसले होते. सायंकाळी ५ वाजता संतोषच्या घरासमोर मद्यधुंद अवस्थेत दोघे विनाकारण भांडण करत होते. यावेळी भांडणात शिवाजीने संतोषला बेदम मारहाण करत खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. हे पाहून गंगुबाईने आरडाओरड केली, असता इतर नातेवाईक धावत आले आणि त्यांनी संतोषला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगुबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चव्हाण याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.
दारूने केला घात
दररोज सोबत दारू पिऊन वाद घालत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या वादाकडे दुर्लक्ष केले होते; मात्र दारूच्या नशेत गळा दाबल्याने चुलत भावाचा मृत्यू झाल्यानंतर काही काळ आरोपी शिवाजी चव्हाण हा गांगरून गेला होता. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.