पायात पादत्राणेही नाहीत; ‘देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन’
शिरूर कासार : श्रीक्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म नाथ महाराज पालखी प्रस्थानला उपस्थिती लावून पंढरीकडे प्रस्थान ठेवलेले ७२ वर्षी वारकरी आजोबा शिरूरवरून मार्गस्थ झाले. पायात चप्पल नाही. मात्र, हातात टाळ आणि मुखाने रामकृष्ण हरी नामस्मरण करत सुरू आहे प्रवास.
‘लोकमत’ने त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली असता, नाशिक जिल्ह्यातील करंजगव्हाण हे गांव व कृष्णा महाराज अहिरे असे नाव सांगितले. कोरोनामुळे शासनाने माउली पालखी सोहळ्यावर निर्बंध घातले. मात्र, वारी चुकू नये, या जिज्ञासेपोटी आपण एकटेच वारीला निघालो आहोत. एकटेच असा प्रश्न विचारता, ‘देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन’ असा श्रद्धायुक्त विश्वास बोलून दाखविला. १९७२ पासून आपण अखंडित वारी करत असून, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे खंड न पडू देता, एकटाच वारी करतोय. या भक्ती आणि विश्वासाची कवचकुंडले घालून हे वारकरी आजोबा चालत आहेत.
दुपारच्या वेळेला दोन घास खाऊन ‘लोकमत’मधील आलेल्या ‘दाटे कंठ लागे डोळीया पाझर’ या बातमीचे अवलोकन केले. कोरोनाचे निर्बंध फक्त धार्मिक कार्यक्रमावरच लादली जातात. संस्कृतीलाच बाधा व खंड पाडण्याचा प्रयत्न केला जातो, वारी, सप्ताह, यात्रा या कार्यक्रमाशिवाय अन्य सर्वत्र गर्दी रोखली जाताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली.
‘नको चिंता करू व्यर्थ या पोटाची’ असे म्हणत मागे-पुढे उभा राहे सांभाळीत! तो विठ्ठल वारकऱ्यांची सर्वस्वी काळजी घेत असल्याने, मी लाॅकडाऊनमध्येही वाऱ्या केल्या असल्याचे सांगितले. २ जुलै रोजी दुपारी हे आजोबा वारकरी पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.
020721\img20210702113848.jpg
पंढरीकडे पायी वाटचाल