बँकेचे ग्राहक डाॅ. अनिल बारकूल यांनी २८ जून २०१६, २० सप्टेंबर २०१७ व ८ ऑक्टोबर २०१८ रोजी तीन धनादेश वटविण्यासाठी बीड येथील जालना रोडवरील एसबीआयच्या मुख्य शाखेत विहित मुदतीत जमा केले. यातील एक धनादेश मुंबईच्या येस बँकेचा, तर दोन धनादेश स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचे होते. यातील नमूद रक्कम डॉ. बारकूल यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे डॉ. बारकूल यांनी वारंवार बँकेशी संपर्क केला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. संबंधित बँकांना मुदतीत क्लिअरिंगला न गेल्याच्या कारणामुळे ते परत आल्याचे उत्तर मिळाले. मुदतीत दाखल केलेले धनादेश तत्काळ वटविण्यासाठी पाठवणे एसबीआय शाखेवर बंधनकारक होते. डॉ. बारकूल यांनी यासंदर्भात वकिलामार्फत नोटीस पाठवून धनादेशातील रक्कम व्याजासह मिळण्याची मागणी केली. तरीही समाधान न झाल्याने डॉ. बारकूल यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. तिन्ही धनादेशांची रक्कम, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापेटी नुकसानभरपाई, तसेच तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून तक्रार दाखल केली.
या प्रकरणात सुनावणीदरम्यान बँकेने बाजू मांडून तक्रारदाराने आयोगापुढे केलेली मागणी मुदतबाह्य असल्याचे नमूद केले, तसेच इतरही युक्तिवाद करण्यात आला, तर येस बँकेने त्यांचा लेखी जबाब दाखल न केल्याने तक्रार त्यांच्या लेखी जबाबाशिवाय चालविण्यात आली, तर स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेने युक्तिवाद करत सेवेत कोणताही कसूर केला नसल्याची बाजू मांडली.
सुनावणी अंती ग्राहक तक्रार आयाेगाने तक्रारदार हे बँकेचे ग्राहक आहेत. बँकेने त्यांच्या सेवेत त्रुटी ठेवली. तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारकर्ता अंशत: भरपाई मिळण्यास पात्र असल्याने तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत असल्याचे निर्णयात म्हटले आहे. त्यानुसार प्रतिवादी एसबीआयने तक्रारदार डॉ. बारकूल यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी ५ हजार रुपये व तक्रारीचा खर्च २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कि. कुलकर्णी, सदस्या अपर्णा दीक्षित, मेघा करूड यांनी हा निर्णय दिला.