-------------
महिला बचतगट आर्थिक संकटात
अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक महिलांनी बचतगटाची स्थापना केली. परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचतगटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या. तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचतगट आर्थिक संकटात सापडले आहेत.
---------------
शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित
अंबाजोगाई : तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.
------------
तंटामुक्त गाव समित्या कागदावरच
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कारप्राप्त गावांमध्ये अनेक वादविवाद निर्माण होत आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोजवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते; परंतु प्रत्यक्ष कामाकडे सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.