बीड : जिल्ह्यातील एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
एक महिला अत्याचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेली होती. दरम्यान या तक्रारीची माहिती आरोपीला पोलिसांनी दिली व त्या महिलेचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यानंतर आरोपीने महिलेचे अपहरण करून तिला मारहाण करत तिचा मोबाईल फोडून टाकला व गळा दाबून जबरदस्तीने दारू पाजली. तसेच पाडळसिंगी टोल नाका परिसरात जीवे मारण्याच्या उद्देशाने नेले. मोटरसायकलवरून स्वतः उडी मारल्याने ती मोटरसायकल दुसऱ्या गाडीवरती धडकवली. यात ती महिला गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात उपचार घेत आहे.
यासंदर्भात माहिती देऊन देखील याची दखल पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. याप्रकरणी वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी महिलेची भेट घेऊन तिच्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी जिल्हाधिकारी यांना कार्यकर्त्यासमवेत निवेदन दिले आहे. तसेच महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रकरणांमध्ये दोषी असलेले शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोहे. मेकले, पोउनि पाटील व ठाणेप्रमुख साईनाथ ठोंबरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर, अनिल डोंगरे, सचिन मेघडंबर, प्रमोद निकाळजे आदि उपस्थित होते.
पीडितेचा आत्मदहनाचा इशारा
अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही तर, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडितेकडून देण्यात आला आहे. आरोपी हा एका पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याच्यावर काही नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे कारवाई होत नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांनी दिली आहे.
010721\01_2_bed_17_01072021_14.jpg
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी दिसत आहेत.