बीड : ज्वलंत विषयावर जनजागृती करण्यास विद्यार्थी कामाला लागले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सध्या जनजागृती करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूणहत्या, लेकवाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंवर्धन आदी मुख्य विषयांना हात घालत विद्यार्थी स्वयंसेवक जागृती करण्यास पुढे सरसावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त सप्ताह पाळण्यात येत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम रासेयो विभागाच्यावतीने घेण्यात येत आहेत. शनिवारी येथील बलभीम महाविद्यालयात रांगोळी, पोस्टर्स, घोषवाक्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन काळाची गरज, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री साक्षरता आदी ज्वलंत विषयांना हात घालत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी केला. सिंहासनी जोशी, किरण नंदरधने, भाऊसाहेब डाके, वेदा सरवदे, प्राजक्ता देवधरे, मयूर खोले या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून बेटी बचाओचा संदेश दिला. तर रितेश कोकाटे, ऋषीकेश लांडगे, ऋषीकेश परजणे या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला. तसेच पोस्टरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी जलसाक्षरतासह विविध विषयांवर फलक लावले. तर घोषवाक्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे संदेश दिले.प्राचार्य डॉ. वसंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अनिल चिंधे, प्रा.डॉ. मनोहर सिरसाट, प्रा.बी.टी. ताटे, प्रा. टी.पी. धापसे आदींनी स्पर्धेचे परीक्षण केले. (प्रतिनिधी)
रांगोळीतून ‘लेक वाचवा’चा संदेश
By admin | Updated: September 27, 2014 23:25 IST